

मिडल ईस्टमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे जगभरात ऊर्जा संकटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे भारतातही “पेट्रोल-डिझेल संपणार का?” अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र, आता सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना दिलासा दिला आहे.
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी Indian Oil Corporation (IOC) ने स्पष्ट केलं की देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. कंपनीने नागरिकांना आवाहन केलं आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका. घाबरून जास्त प्रमाणात इंधन खरेदी करू नका. IOC च्या मते, अशा अफवांमुळे अनावश्यक ताण निर्माण होतो आणि पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) आणि Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) यांनीही अशाच प्रकारचा खुलासा केला आहे. BPCL ने सांगितलं की, भारत हा पेट्रोल आणि डिझेलचा नेट एक्सपोर्टर आहे. कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल आणि ATF चा पुरेसा साठा उपलब्ध आहे. HPCL नेही स्पष्ट केलं की देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे स्थिर आहे.
मिडल ईस्टमधील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेषत: LNG आणि LPG पुरवठ्यावर दबाव आहे, कतारसारख्या देशांमधील उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत. हॉर्मुझची सामुद्रधुनी परिसरातील तणाव आहे. यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि अफवा पसरत आहेत.
या संकटाचा सर्वाधिक परिणाम LPG वर दिसून येत आहे. भारत सुमारे 60% LPG आयात करतो त्यातील मोठा हिस्सा खाडी देशांमधून येतो. म्हणूनच घरगुती वापरासाठी LPG ला प्राधान्य दिलं आहे, हॉटेल-रेस्टॉरंटसाठी पुरवठा काही प्रमाणात मर्यादित आहे.
सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पर्यायी उपायांवर काम करत आहे. सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नाही. सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे की देशात पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. म्हणून नागरिकांनी घाबरून अतिरिक्त खरेदी करण्याऐवजी शांत राहून अफवांपासून दूर राहणं गरजेचं आहे.