

LPG Booking Rule: एलपीजी सिलेंडर बुकिंगबाबत गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. ''आता सिलेंडर बुक करण्यासाठी 25, 35 किंवा 45 दिवस वाट पाहावी लागणार, उज्ज्वला योजना धारकांसाठी वेगळे नियम लागू झाले आहेत'', अशा बातम्यांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारने या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने संदर्भात विशेषतः सोशल मीडियावर असे सांगितले जात होते की, या योजनेतील लाभार्थ्यांना 45 दिवस थांबावे लागेल, तर इतर ग्राहकांसाठी 25 किंवा 35 दिवसांचे वेगळे नियम असतील. मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की असे कोणतेही नवे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लोकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
सरकारच्या माहितीनुसार, एलपीजी बुकिंगसाठी जुनेच नियम आहेत:
शहरांमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी: 25 दिवसांनंतर बुकिंग करता येते
ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी: 45 दिवसांनंतर बुकिंग करता येते
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नियम सर्वांसाठी समान आहेत, कोणत्याही योजनेसाठी वेगळे नियम नाहीत.
जर एखाद्या ग्राहकाने ठरलेल्या वेळेपूर्वी सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला, तर सिस्टम आपोआप ती बुकिंग ब्लॉक करेल. ही वेळ मागील सिलेंडर डिलिव्हरीच्या तारखेपासून मोजली जाते. त्यामुळे ग्राहकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
सरकारने स्पष्ट सांगितले आहे की, देशात सध्या एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. सर्व ग्राहकांसाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. वारंवार बुकिंग करण्याची गरज नाही.
दरम्यान, जागतिक स्तरावर काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः इराणमधील तणाव आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी परिसरातील घडामोडींमुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर दबाव येऊ शकतो. सरकारने सांगितले आहे की, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही.
एलपीजी बुकिंगसंदर्भात पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. सध्या कोणताही नवीन नियम लागू झालेला नाही आणि जुनीच बुकिंग सिस्टीम सुरू आहे. सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, नागरिकांनी फक्त विश्वासार्ह स्रोतांवरच विश्वास ठेवावा आणि चुकीच्या अफवा पसरवू नयेत.