

PM Modi Gold Appeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे 2026 रोजी हैदराबादमधील सभेत देशवासियांना एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर ज्वेलरी उद्योगावर मोठ संकट आलं आहे. दिल्लीसह देशभरातील ज्वेलर्स, सोनार, कारागीर आणि छोटे व्यापारी या आवाहनामुळे चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम सुरू असताना अशा प्रकारच्या आवाहनामुळे सोन्याच्या मागणीत मोठी घट होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे (CTI) अध्यक्ष बृजेश गोयल यांनी सांगितलं की, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, भारतात लग्नांमध्ये सोन्याचं विशेष महत्त्व असल्यामुळे जर लोकांनी खरेदी कमी केली, तर ज्वेलरी बाजाराला मोठा फटका बसू शकतो.
भारत हा चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने ग्राहक देश आहे. दरवर्षी भारतात सरासरी 700 ते 800 टन सोन्याची खपत होते. मात्र, मोदींच्या आवाहनानंतर ही खपत 500 टनांपर्यंत घसरू शकते, असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ज्वेलरी बाजारातील सर्वात मोठी चिंता म्हणजे रोजगार. व्यापाऱ्यांच्या मते, जर सोन्याची विक्री कमी झाली, तर छोटे ज्वेलर्स आणि सोनारांना कर्मचाऱ्यांचे पगार देणं कठीण होऊ शकतं.
अशा परिस्थितीत काही ठिकाणी नोकरकपात किंवा व्यवसाय बंद होण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः छोट्या शहरांतील आणि पारंपरिक सोनार व्यवसायावर याचा अधिक परिणाम होऊ शकतो.
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे महासचिव गुरमीत अरोरा आणि रमेश आहुजा यांच्या मते, भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचं साधन नाही. ते भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लग्नसमारंभ, सण आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये सोन्याचे दागिने जवळपास अनिवार्य मानले जातात. म्हणूनच, लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी खरेदी कमी केली, तर त्याचा थेट परिणाम ज्वेलरी उद्योगावर होऊ शकतो.
या आवाहनाचा परिणाम ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्सवरही होऊ शकतो, अशी चर्चा आहे. ज्वेलरी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या जसे की Titan Company, Senco Gold आणि Kalyan Jewellers यांच्या शेअर्सवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांच्या मते, जर मागणी कमी झाली तर कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसू शकतो.
पंतप्रधान मोदी यांनी हे आवाहन परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने केलं आहे. भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो आणि त्यासाठी मोठं परदेशी चलन खर्च होतं. मिडल ईस्टमधील तणाव, वाढत्या तेलाच्या किंमती आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताचा परकीय चलन साठा जपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचं मानलं जात आहे.
मात्र, या आवाहनाचा प्रत्यक्ष परिणाम किती होईल आणि ग्राहक खरंच सोने खरेदी टाळतील का, हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र ज्वेलरी बाजारात संभ्रम आणि चिंता वाढल्याचं दिसत आहे.