साेनाली जाधव : पुढारी ऑनलाईन
शेतीमधील उत्पन्न हे अळवावरचं पाणी, पिकाला किती उत्पन्न मिळेल याची हमी कोणीच देत नाही, अशी खंत नेहमीच शेतकरी व्यक्त करत असतो. त्याचं कारणही तसेच आहे. शेतकरी हा व्यापारी नाही. तो शेतात राबतो, आपल्या शेतात पीक फुलवतो. मात्र त्याच्या काबाडकष्टाला योग्यआर्थिक मोबदला मिळेल याची हमी कोण देणार? या प्रश्नाचे उत्तर आजही बळीराजा शोधत आहे. मात्र शेतकर्यांना उत्पादनाची हमाखास हमी मिळण्यासाठी आता गणिताची (ARIMA) मदत होणार आहे. सिंबोयासिस विद्यापीठातील (पुणे) संख्याशास्त्र विभागातील प्रा. डॉ. दादासाहेब गोडसे आणि पुणे विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील निवृत्त प्रोफेसर डॉ. अनिल गोरे यांनी कोथिंबीर उत्पादनाचे 'गणित' मांडलं आहे. जाणून घेवूया त्यांनी आपल्या संशोधनात काय मांडलं आहे ते.
डॉ. गोडसे आणि डॉ. गोरे यांनी आपल्या संशोधनात म्हटलं आहे की, कोथिंबीर उत्पादकाच्या अडचणींवर मात करण्यासाठी टाईम सीरीज नावाचं गणित उपयोगी पडू शकते. या गणिताच्या मांडणीतून संगणकाच्या मदतीने भविष्यातील बाजारभावाचा अंदाज करता येतो. त्यासाठी गरज आहे ती आधीच्या बाजारभाव माहिती असल्याची. याच्या आधारे गणित करुन पुढील काही दिवसाचा भाव कसा असेल याचा अंदाज मांडता येतो. यासाठी त्यांनी दिलेले उदाहरण पुढील प्रमाणे : कोल्हापूर आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोज खरेदी-विक्री होते. याची नोंद सरकारी वेबसाईटवर होते. येथे मालाची होणारी आवक आणि सरकारी विक्री किंमतीची माहिती मिळते. रोजच्या भावाचे आकडे एकापुढे एक ठेवले की ही भावसाखळी बनते. भावसाखळी, तारीख वार भाव मांडले की बनते टाइम सीरीज बनते. सलग १०० दिवसांची भावसाखळी घेतली तर एखाद्या उत्पादनाच्या दरातील चढ-उतार स्पष्ट होतात. तांत्रिक भाषेत याला ARIMA नामक पद्धती म्हणतात. या समीकरणाचा वापर करुन पुढील आठवड्यात कसे भाव राहतील याचा अंदाज बांधता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
शेतकर्यांना आपल्या पिकांना चांगले उत्पन्न हवे असेल तर प्रत्येक पिकासाठी वेगळे गणित करायला हवे. तसेच प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वेगळी आकडेवारी घ्यायला हवी. जेव्हा भाव कोसळले तेव्हा कृषी माल पाठवायचा नाही. भाव वाढेल तेव्हाच माल पाठवावा, असेही निरीक्षण हा संशोधनात नोंदविण्यात आले आहे.
या संशाेधनासाठी त्यांनी ARIMA नामक पद्धतीचा वापर केला. मध्ये १०० दिवसांच्या कोथंबिरीच्या किंमती घेतल्या आहेत. १०० दिवसांचे यासाठी घेतल्या कारण कोंथिबीरीचे पीक हे साधारणपणे ९० दिवसांत येते यासाठी १०० दिवसांचे दर घेतले आहेत. त्यानुसार ARIMA पध्दतीने संशोधन करुन अंदाज वर्तवता येताे. आहे. यामध्ये सोलापूर येथील दिनांक २० मार्च २०२ पासून दिनांक २७ जून २०२१ पर्यंतचे भाव वापरुन आठ दिवसांच्या भावांचे अंदाज काढले. कोल्हापूर बाजारातील दिनांक ३ जून २०२१ पासून १६ सप्टेंबर २०२१ पर्यंतचे भाव वापरून आठ दिवसांच्या भावाचा अंदाज काढला गेला. पुढील तक्त्यामध्ये अंदाजे भाव आणि खरे भाव यामध्ये तफावत आहे. तुम्हाला वाटेल या संशोधनाचे अंदाज बिनचुक नाहीत; मग या अंदाजाचा काय उपयोग? प्रश्न रास्त आहे; पण थोडासा तार्कीक अंदाज बांधून आपला माल बाजारात नेला तर नक्कीच या पध्दतीचा फायदा होईल. यासाठी अंदाजित भावांपैकी सर्वात जास्त भाव कोणत्या तारखेदिवशी आहे ती तारीख पहा. त्या दिवशी माल बाजारात विक्रीसाठी न्यायचा. चांगला दर मिळेल या अपेक्षेने. पण आपल्याला फायदा खरचं झाला आहे का? हे कसे तपासायचे यासाठी संशोधकाने जुनी आकडेवारी घेतली आहे.
निवडलेल्या तारखेला माल बाजारात नेला असता तर काय भाव मिळालाअसता हा अंदाज तक्त्यावरुन लावता येईल. कारण त्या दिवशी खरा भाव आपल्याला माहित आहे. शंका एवढीच उपस्थित होते की, हा भाव चांगला मिळाला कशावरून? कशाशी तुलना करायची? तर ही तुलना सरासरी भावाशी करावी.
(ARIMA) सोलापूर बाजाराचा तक्ता सांगतो की, सर्वात जास्त अंदाजीत भाव २८ जून २०२१ या दिवशी होता. त्या दिवशी माल बाजाराला पाठविणाऱ्या शेतकऱ्याला ७०० रु भाव मिळाला असता. आठ दिवसांचा सरासरी भाव ४४४ रु आहे. म्हणजेच या पद्धतीने दिवस निवडणाऱ्यांचा चांगला फायदा झाला असता.कोल्हापूर बाजाराचा तक्ता सांगतो की, सर्वात जास्त अंदाजीत भाव २२ सप्टेंबर २०२१ या दिवशी होता. त्या दिवशीचा खरा बाजार भाव ७७०० रु. होता. आठ दिवसांचा सरासरी खरा भाव ५७७५ रु. होता. यावरून दिसते की, या संशोधनातील पद्धतीने दिवस ठरवला तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. (ARIMA) या संशोधनात एक मर्यादा आहे ती म्हणजे प्रत्येक पिकासाठी वेगळे गणित करायला हवे. तप्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी वेगळी आकडेवारी घ्यायला हवी, असेही प्रा. डॉ. दादासाहेब गोडसे आणि डॉ. अनिल गोरे यांनी आपल्या संशाेधनात नमूद केले आहे.
आम्ही कोथिंबीर उत्पादकाला मदत होण्यासाठी एक संशोधन केलं. यामध्ये १०० दिवसांच्या अंदाजे बाजारातील दरांची माहिती घेतली. कोथिंबीर हे पीक तीन महिन्यांमध्ये विक्रीला येते. विक्रीवेळी शेतकर्यांना त्यांच्या कष्टाचा याेग्य माेबदला मिळावा यासाठी संख्याशास्त्रातील ARIMA नामक पद्धतीने कोथिंबीर उत्पादकांना मदत हाेवू शकते. शेतकऱ्यांनी या पध्दतीचा वापर करावा. या विषयावर शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्वच पिकांच्या विक्रीसाठी याचा फायदा हाेवू शकताो. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही पध्दती कशी जाईल, यासाठी सर्वपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
डॉ. दादासाहेब गोडसे ( सिंबोयासिस विद्यापीठ, पुणे )