

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी गडचिरोली, चंद्रपूरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत, शेतकऱ्यांशी संवाद साधला. या ठिकाणच्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहत, आता शेतकऱ्यांची सहनशिलता संपली आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, तात्काळ पंचनामे करा असे खडेबोल शिंदे-फडणवीस सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुनावले.
अजित पवार म्हणाले, अद्यापही सरकारकडून या ठिकाणच्या पुरग्रस्त भागाचे पंचनामे सुरू झालेले नाहीत. सरकारने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा येथे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील लोकांची परिस्थिती पाहता तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मविआमध्ये उशीरा मदत मिळत असल्याचे म्हणत, अजित पवारांचा हा राजकीय दौरा असल्याचे म्हटले होते. त्यांनी केलेल्या या टिकेला उत्तर देताना, हा दौरा राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी असल्याचे प्रतिउत्तर अजित पवार यांनी फडणवीसांना दिले.