सुमारे 350 वर्षांच्या परंपरेनुसार दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या सायंकाळी शिवारातील एका शेतात खड्डा खोदून त्यात पाणी भरलेला मातीचा घट ठेवला जातो. त्यावर कुरडया, पुरी, भजी आदी तळलेले पदार्थ तसेच बाजूला पानसुपारी व विविध १८ प्रकारच्या कडधान्यांची मांडणी केली जाते. रात्रीतून या पदार्थात व घटामध्ये काही बदल झालेले दिसून येतात. त्यावरून वर्षभराचा हंगाम, पीक पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत या घटमांडणीतून वर्तविले जाते. याकडे शेतकरी वर्ग, व्यावसायिक व राजकीय लोकांचेही लक्ष लागून असते. भेंडवळ येथील चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे या घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून अनुमान जाहीर करतात. या घटमांडणी प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरीही अनेक शेतकरी यावर विश्वास ठेऊन आपलं वर्षभराचं शेतीविषयक नियोजन करतात.