बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
बेळगावात गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचा विधानसभेत निषेध केला होता. पण, समितीविरुद्ध कोणती कारवाई करावी, याचा निर्णय घेतला नव्हता. चर्चेअंती कारवाईबाबत निर्णय होईल, असे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.
येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले, बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनावेळी बंगळुरातील शिवपुतळा विटंबना आणि संगोळ्ळी रायण्णा पुतळा विटंबना प्रकरणानंतर तेथे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करण्यात आले होते. बेळगावात तोडफोड झाल्यानंतर म. ए. समितीच्या 38 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध खटलेही दाखल केले होते. विधानसभेत पुतळा विटंबना घटना आणि म. ए. समितीबाबत निषेध व्यक्त केला होता. पण, समितीविरोधात कारवाई करण्याविषयी चर्चा झाली नव्हती. यावर चर्चा करून कारवाई केली जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
गतवर्षी 17 डिसेंबर रोजी बंगळुरातील सदाशिवनगरातील शिवपुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याविरुद्ध कारवाईची मागणी करुन कार्यकर्ते बेळगावातील संभाजी चौकात जमले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. 250 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते.
काही दिवसांआधी अटक केलेल्या समिती कार्यकर्त्यांना तसेच इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांना जामिनावर सोडण्यात आले. समितीच्या 35 कार्यकर्त्यांवरील देशद्रोहाचे खटले मागे घेण्यात आले. यामुळे पोटशूळ उठलेल्या काही कन्नड संघटनांनी याविरुद्ध निदर्शने केली. समितीवर कारवाईची मागणी त्यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी सविस्तर चर्चा करुन कारवाई केली जाईल, असे सांगितले.