निपाणी: पुढारी वृत्तसेवा: मित्रासमवेत पर्यटनासाठी गेलेल्या आंदोलननगर, निपाणी येथील दोन तरुण काळम्मावाडी धरण क्षेत्रातील डोहात बुडाल्याची घटना आज (दि.१) दुपारी घडली. दरम्यान बुडालेल्या दोघा तरुणांचा पोलिस प्रशासनासह जीवरक्षक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र, या परिसरात पावसाचा जोर असल्याने सायंकाळी ६ नंतर ही शोधमोहीम थांबवण्यात आली. प्रतीक संजय पाटील (वय २२) व गणेश चंद्रकांत कदम (वय १८) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान उद्या (दि.२) पासून सकाळी पुन्हा पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेतला जाणार आहे.
निपाणी परिसरातून एकत्रित शिकणाऱ्या महाविद्यालयीन एकूण १३ जण पर्यटनासाठी सोमवारी सकाळी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्सने गेले होते. दरम्यान काळम्मावाडी धरणाच्या डोहात प्रतीक व गणेश हे दोघे बुडाले. यावेळी बुडणाऱ्या गणेशला वाचवण्यासाठी प्रतीक हा धावला असता दोघांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. ही घटना समजताच इतर सहकार्यांनी आरडाओरड केली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पाण्यातच बुडाले.
दरम्यान, या घटनेची माहिती समजतात निपाणी येथून टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील, वसंत धारव, संदीप इंगवले सामाजिक कार्यकर्ते विनोद बल्लारी, रवींद्र इंगवले, बाळू शिंदे, रणजीत मगदूम, तुकाराम सुतार, सागर पाटील, विजय सुतार, अनिल श्रीखंडे, नितीन उपाळे यांच्यासह आंदोलननगर व परिसरातील नागरिक, कुटुंबीय व नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले.
यावेळी स्थानिक पाणबुड्यांना अपयश आल्याने कोल्हापूर येथील जीवरक्षकांना पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार बुडालेल्या दोघांचा सायंकाळी ६ पर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने शिवाय शोध कामात अडथळा येत असल्याने राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड व स्थानिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधकार्य थांबवून उद्या सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबविली जाणार असल्याची माहिती दै.पुढारीशी बोलताना दिली.
निपाणी परिसरात एकूण १३ जण मित्र काळमावाडी परिसरात पर्यटनासाठी गेले होते. दरम्यान डोहात दोघे मित्र बुडाल्याने सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करीत दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले. दरम्यान वाहुन गेलेल्या दोघांना शोधण्यासाठी गेलेल्या कुटुंबीय, नागरिक व प्रशासनासमवेत थांबून बुडालेल्या मित्रांचा शोध घेतला. मात्र, शोध थांबवल्यानंतर सोबत गेलेले ते ११ जण आपल्या घरी सुखरूप परतले.
काळमवाडी धरणाच्या डोहात बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, कुटुंबीय व नातेवाईकांनी कोल्हापूर येथील स्कुबा डायविंग आपत्कालीन दिनकर कांबळे यांना पाचारण केले आहे. कांबळे हे मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष डोहात बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षात आतापर्यंत कांबळे यांनी स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून ५ हजार मृतदेह शोधले असून सुमारे १४०० जणांना त्यांनी जीवदान दिले आहे. याशिवाय अनेक प्राण्यांचे प्राणही त्यांनी वाचवले आहेत. त्यामुळे कांबळे यांना या शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती आंदोलननगर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र इंगवले व टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली.