कर्नाटक : पंतप्रधान मोदींना रक्ताने लिहिले पत्र
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
पोलिस उपनिरीक्षक परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करुन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र मोदींना पाठवले आहे. 2021 मध्ये झालेल्या बी. ए. परिक्षेतील गैरव्यवहाराबाबतही चौकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरव आहे. त्यांच्याकडून न्याय मिळणार असल्याचा विश्वास आहे. सरकारी नोकरीसाठी लाच द्यावी लागते. सरकारच्या या व्यवस्थेमुळे अनेक प्रामाणिक आणि पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. अशा प्रकारांमुळे स्पर्धा परीक्षेवरील विश्वास उडाला आहे. यापुढे परीक्षा देणार नाही. न्याय मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
अन्याय दूर करण्याची मागणी आठ उमेदवारांनी केली आहे. त्यांनी आपल्या रक्ताद्वारे पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे. दोन पानी पत्र रक्ताने लिहिण्यात आले आहे.