वाई; पुढारी वृत्तसेवा : सध्या वाई तालुक्यात उसाची तोड मोठ्या प्रमाणात सुरू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखाने नेत नसल्याने उसाला तुरे फुटलेले आहेत. शेतात ऊस नसून नुसत्या फुकण्या उभ्या आहेत. त्यामुळे वजनात घट होऊन उत्पादनात फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी अहोरात्र कष्ट करूनही शेतकर्यांच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वाई तालुका ऊस, आले, हळद, व भाजीपाल्यासाठी प्रसिध्द आहे. इतर तालुक्याच्या मानाने वाई तालुका सधन मानला जातो. शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात. या तालुक्यातील बागायती शेतकर्यांचे ऊस हेच पीक उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करताना शेतकरी दिसत नाही.
अतिवृष्टीमुळे यावर्षी उसाच्या पिकाला कालावधी पूर्वीच तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बळीराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेतच ऊस घेवून जावा व वेळेतच उस बिले सुध्दा द्यावीत, अन्यथा तालुक्यातील शेतकरी संघर्ष करण्याच्या तयारीत आहे.
वाई तालुक्यात सध्या उसाच्या लागवडीलाही जोर आला आहे. या पिकासाठी शेतकर्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. खते, बियाणे, शेताची मशागत, मजूर, लागणारे पाणी, यासाठी शेतकरी विकास सेवा सोसायटीचे कर्ज काढतो त्याचे व्याज सुध्दा काही वेळा निघत नाही. तरीही उसाच्या अंतर्गत होणार्या इतर पिकांच्या उत्पन्नात समाधान मानून बळीराजा हे धाडस करताना दिसत आहे.
खरीप हंगामातील ऊस, हळद सोडून सर्व पिके वाया गेल्याने बळीराजाची सर्व भिस्त सध्या उसाच्या पिकावर आहे. त्यालाच तुरे फुटल्याने उसाचे वजन कमी भरून पोकळ बांबू तयार झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण परिसरात पांढरी शुभ्र चादर पसरली असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.
हेही वाचलत का?