Panand Raste Jalna
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामाला अखेर वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कामामुळे शेतीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.
आजवर रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. तसेच मिरची, भाजीपाला, फळबागांसह विविध पिकांचा माल बाजारपेठेत नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खराब रस्त्यांमुळे वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च वाढत होता. मात्र आता पाणंद रस्त्यांच्या कामामुळे या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
राजर्षी शाहू कॉलेज ते चौरेवाडी या मार्गावरील सुमारे एक किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून परिसरात एकूण नऊ किलोमीटरहून अधिक रस्ते विकसित केले जात आहेत. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर ट्रॅक्टर, शेतीची अवजारे आणि मालवाहतूक करणारी वाहने थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचू शकणार आहेत.
यावेळी पांदण रस्ता समिती सदस्य सुभाष भाऊ देशमुख, मा पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे, मा.सरपंच गणेश पाटील लोखंडे, रामेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक संजय पाटील लोखंडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
पाणंद रस्त्यांच्या कामामुळे पारध परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. ग्रामीण भागातील विकासाला गती देणारे हे काम भविष्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीलाही हातभार लावणार असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
पूर्वी शेतात जाण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. रस्ता नसल्याने बैलगाडीवर अवलंबून राहावे लागत असे. आता पाणंद रस्ता झाल्याने ट्रॅक्टर व इतर वाहने थेट शेतापर्यंत पोहोचत आहेत. याचा शेती उत्पादनावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. चौरेवाडी ते स्मशानभूमी हा पाणंद रस्ताही पूर्ण झाला आहे.- परमेश्वर पाटील लोखंडे, पंचायत समिती सभापती
पारध परिसरातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागत आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च वाचणार असून शेती उत्पादनाला चालना मिळेल. ग्रामीण विकासासाठी अशा मूलभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत.- सुभाष देशमुख (पांदण रस्ता समिती सदस्य भोकरदन)