मुंबई : पुढारी वृत्तसेवा
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षा (SSC-HSC exam 2022) ऑफलाईनच होणार असल्याचे मत शिक्षण विभागाने दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होते. दहावी आणि बारावी परिक्षा संदर्भात आम्ही सर्व गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आवाहन आहे की, त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. (SSC-HSC exam 2022)
पुढे गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील. केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन शिक्षण धोरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही, असे गायकवाड म्हणाल्या.
यंदाची परिक्षा ऑनलाईन घ्यावी, अशी मागणी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केले होते. मात्र यंदाचे पेपर हे ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आता परिक्षेचा अभ्यास करावा, विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण विभाग काम करत असल्याचे गायकवाड म्हणाल्या.