Uncategorized

Nashik News : तर नाशकातही उत्तराखंडासारखा प्रलय : आध्यात्मिक गुरू श्री एम. यांनी व्यक्त केली भीती

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, गोदावरी नदीप्रदूषणमुक्त केली नाही तर उत्तराखंडातील प्रलयासारखी स्थिती नाशकातही उद‌्भवू शकते, अशी भीती आध्यात्मिक गुरू श्री एम. यांनी व्यक्त केली आहे. गोदास्वच्छतेसाठी पंचवार्षिक कृती आराखडा तयार केला असून, शासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांबरोबरच यासाठी लोकसहभागाचीही जोड हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Nashik News)

स्वच्छता अभियानांतर्गत गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अविरल गोदावरी अभियानाचा प्रारंभ सोमवारी (दि.२) श्री एम. यांच्या हस्ते नाशिकमध्ये केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री एम. म्हणाले की, पृथ्वी माता ही परमेश्वराचे शरीर आहे. त्यामुळे दररोज आपण जसे स्नानाने शुध्द होतो, तसेच पृथ्वीलादेखील जपले पाहिजे. अध्यात्माच्या माध्यमातून गोदावरी माता शुद्ध होऊ शकते. ज्याप्रमाणे ध्यानाने मन शुध्द होते, त्याप्रमाणे सेवेने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते, असे नमूद करत आज जर गोदावरी प्रदूषणमुक्त केली नाही तर उद्या उत्तराखंडासारखी परिस्थिती नाशकातही उद‌्भवू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. (Nashik News)

गोदास्वच्छतेसाठी पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार केला असून, टप्प्याटप्याने त्याची अंमलबजावणी होईल. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभाग वाढल्यानंतर शासकीय पातळीवर दखल घेतली जाते. त्यामुळे शासनालाही सक्रिय सहभाग घ्यावा लागतो, याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. प्रथमतः ब्रह्मगिरीवर गवत अन् वृक्षलागवड करण्याचा उद्देश असल्याचे एम यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी उत्तमरीत्या काम होत आहे. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत प्लास्टिकमुक्त गोदावरीचा सर्वच जण संकल्प करू या. पुढील काळात वृक्षलागवड, नदी स्वच्छता अन् कुंडे पुनरुज्जीवित करण्यासाठी लोकसहभाग आणखी वाढेल अन् गोदा प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT