गेवराई; पुढारी वृत्तसेवा : संपुर्ण जुन महिना लोटला तरी गेवराई तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने वन्य जीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना दोन काळविटांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील जळगाव शिवारात शुक्रवारी (दि. १) रोजी रात्री घडली. दरम्यान, ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहिरीबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
जवळगाव शिवारात विहिरीत शुक्रवारी (दि.१२) रोजी संध्याकाळच्या सुमारास दोन काळविट पडले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर गावचे पोलीस पाटील बाबासाहेब खुणे यांनी वनविभागाचे वनपाल टाकणकर यांना याबाबतची माहिती दिली. वनपाल यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहिरीबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढण्यासाठी श्रीमंतयोगी ग्रुपचे सर्वसदस्य , गोविंद बाबासाहेब खुणे, सरपंच पिंटूभाऊ, झुंबर इदगे, शहाजी इदगे, रखमाजी मोरे, कृष्णा इदगे, कुंडलीक खुणे, सुर्यभान खुने यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
हेही वाचलंत का?