पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्हाला जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आम्ही लोकांचे प्रश्नच संसदेत मांडतो. मी असो किंवा खासदार अमोल कोल्हे असोत, आम्ही काल्पनिक गोष्टी लोकसभेत बोलत नाही. तर सत्तेतील सरकार संसदेत काल्पनिक गोष्टी बोलते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज (दि.२९) तिसरा दिवस आहे. दरम्यान,आज खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दौड येथे मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. (Supriya Sule on Government)
देशातील सरकार केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण येथील कष्टकरी जनतेचे दु:ख त्यांना दिसत नाही. सरकार मुद्यांचे बोलत नाही, त्यामुळे जनतेचे महत्त्वाचे प्रश्न भरकटत आहेत. पालकमंत्री हे मालकमंत्री झालेत, असा आरोप खासदार खासदार अमोल कोल्हे यांनी देशासह राज्यातील सरकारवर केला. दरम्यान, त्यांनी देशातील सरकार "एक फूल, दोन डाउनफूल" अशी मिश्किल टीका करत, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, ते माध्यमांशी बोलत होते. (Supriya Sule on Government)
पुढे बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवत आहेत. दरम्यान गेले २२ दिवस देशात कांदा निर्यातीवर बंदी आहे. पण सरकारमधील एकही नेता यासाठी दिल्लीतील सरकारला डोळ्यात डोळे घालून प्रश्न करत नाही, निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत नाही, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले. (Amol Kolhe on Government)
रामाचे नाव मनात ही घेतले तरी चालेल, अन् आयोध्येतही जाऊन घेतले तरी चालेल. रामाचा मक्ता कोण घेतंय, हे देशातील जनता पाहतंय, असेही खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Amol Kolhe on Government)