भारतातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी वैभव सूर्यवंशीच्या क्षमतेवर विश्वास दर्शविला आहे. मागील आठवड्यात आयपीएलमध्ये केलेल्या धडाकेबाज फलंदाजीनंतर IPL चे कमिशनर अरुण धुमल यांनीही त्याच्या टीम इंडियातील निवडीबाबत सूचक विधान केले होते.
Vaibhav Suryavanshi Team India Selection
मुंबई : IPL 2026 मधील धडाकेबाज फलंदाजीमुळे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या तुफान चर्चेत आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण खेळामुळे आता त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहेत. IPLचा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वैभवची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरणार आहे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी आपल्या बॅटचा तडाखा दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. या डावखुऱ्या फलंदाजाची आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्यास, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरेल.या निवडीमुळे तो केवळ पुरुषांमधीलच नव्हे, तर महिला क्रिकेटमधील विक्रमही मोडीत काढू शकतो. सध्या भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम शफाली वर्माच्या नावावर आहे. ती १५ वर्षे, ७ महिने आणि २७ दिवसांची असताना टीम इंडियासाठी खेळली होती. तर पुरुषांमध्ये 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये १६ वर्षे २०५ दिवस वय असताना भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते. वैभवची निवड झाल्यास तो सचिनचा हा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढेल.
भारतातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेचे कौतूक करत याच्या फलंदाजीच्या क्षमतेवर विश्वास दर्शविला आहे. मागील आठवड्यात त्याने आयपीएलमध्ये केलेल्या धडाकेबाज फलंदाजीनंतर IPL चे कमिशनर अरुण धुमल यांनी सूचक विधान केले होते. त्यांनी आपल्या एक्स पोस्ट म्हटलं होतं की, यंदाच्या आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने फलंदाजीचे किती अप्रतिम प्रदर्शन केले आहे! त्याच्या कामगिरीचा विचार करता, हा 'बाल-अष्टपैलू' खेळाडू @BCCI च्या भारतीय संघात सर्वात तरुण खेळाडू म्हणून पदार्पण करण्यास नक्कीच पात्र आहे. एखाद्या प्रतिभावान आणि त्याच वेळी इतक्या (अतिशय) तरुण खेळाडूची निवड करण्याची संधी मिळणे हे दुर्मिळ असते. भारताकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून त्याचे नाव इतिहासात नोंदवले जाण्यास तो नक्कीच पात्र आहे," असेही त्यांनी नमूद केले.
भारताचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ आणि पीयूष चावला यांनीही धुमल यांच्या मताला दुजोरा दिला आहे. कैफने आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, मला आयपीएलच्या गेल्या हंगामात असे वाटलं होतं की, वैभव सूर्यवंशीबाबतची चर्चा खूपच लवकर आणि प्रमाणाबाहेर केली जात आहे. परंतु, एक वर्ष उलटल्यानंतर आता मला असे वाटते की, तो क्रिकेटच्या पुढील टप्प्यावर जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.माजी फिरकीपटू पीयूष चावलानेही ESPNcricinfo शी बोलताना म्हणाला की, १५ वर्षीय वैभव हा प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतो. तसेच संघाला विजय मिळवून देणाऱ्या महत्त्वपूर्ण खेळी खेळू शकतो. तो अशाच प्रकारे खेळत राहिला, तर त्याला थेट वरिष्ठ संघात स्थान मिळताना पाहायला मला नक्कीच आवडेल.
एकीकडे वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातील निवडीबाबत चर्चा सुरु असताना भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने वेगळे मत मांडले आहे. त्यांच्या मते भारताच्या T20 संघाने विश्वचषकाचे विजेतेपद यशस्वीपणे राखले आहे, त्या संघात स्थान मिळवणे हे किशोरवयीन वैभव सूर्यवंशीसाठी आव्हानात्मक असणार आहे. कारण सध्या त्याच्यापेक्षा काही खेळाडू शर्यतीत पुढे आहेत; कारण पुढील ICC स्पर्धेचा विचार करूनच तुम्ही तुमचा संघ निवडता आणि त्याची बांधणी करत असता."
वैभव सूर्यवंशी हा कधीतरी भारतासाठी खेळणारच आहे. तो नक्की कधी खेळेल? त्यासाठी कदाचित आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. आपण प्रत्येक गोष्टीसाठी इतकी घाई का करतो?" असे अश्विनने आपल्या YouTube चॅनेलवर बोलताना सांगितले.
तूर्तास तरी, वैभव सूर्यवंशीची भारतीय क्रिकेट संघात पदार्पणाची शक्यता कायम आहे. कारण यंदाच्या आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यात त्याची कामगिरी दमदार झाली आहे; यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २६ चेंडूंत ७८ धावा, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १७ चेंडूंत ५२ धावा आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूंत ३९ धावांचा समावेश आहे.पण या हंगामातील निम्म्याहून अधिक सामने अजून होणार आहेत. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल, प्रियांश आर्य, तसेच शुभमन गिल यांच्यासारखे खेळाडू शर्यतीत आहे. त्यामुळेच वैभवला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.