Surya Kumar Yadav India Vs Pakistan: टी २० वर्ल्डकप २०२६ मधील सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव करत ग्रुप स्टेजमधील आपला तिसरा विजय मिळवला. कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पाकिस्तानचा डाव ११४ धावात संपुष्टात आणला. भारताच्या या विजयात सलामीवीर इशान किशनने महत्वाची भूमिका बजावली. तसंच गोलंदाजीत भारतीय गोलंदाजांनी सामुहिक कामगिरीचं दर्शन घडवलं.
या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्य कुमार यादव चांगलाच खूष दिसला. या सामन्यापूर्वी अनेक वाद अन् नखरे झाले होते. अखेरीस भारतानं वर्ल्डकपमधील पाकिस्तानवरील आपलं प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. भारताच्या विजयानंतर बोलताना सूर्यकुमार यादवनं हा विजय भारतासाठी असल्याचं म्हटलं. याचबरोबर त्यानं ७७ धावा ठोकणाऱ्या इशान किशनचे देखील तोंडभरून कौतुक केलं.
सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्ही ज्या प्रकारचं क्रिकेट खेलत आलो आहोत त्याच प्रकारचं क्रिकेट आम्ही आजच्या सामन्यात देखील खेळलो. मी नाणेफेकीवेळीच सांगितलं होतं की इथं प्रथम फलंदाजी करणं हा चांगला निर्णय आहे. ज्या प्रकारे इशान किशनने फलंदाजी केली. तो गेल्या काही सामन्यांपासून जशी फलंदाजी करतोय तशीच त्याने आजच्या सामन्यात देखील फलंदाजी केली. त्यामुळं संघाला आघाडी मिळाली.'
सूर्या पुढे म्हणाला, 'आम्ही ज्या प्रकारे आधी खेळत होतो त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला. इशानने वेगळीच खेळी केली. पॉवर प्लेमध्ये कोणाला तरी जबाबदारी घ्यायला हवी होती. त्यानं ती घेतली. पॉवर प्लेमध्ये आम्ही खूप पुढं होतं. त्यानंतर ७ ते १५ या षटकांमध्ये थोडं रेंगाळलो. मात्र हीच तर टी २० क्रिकेटची सुंदरता आहे. तिलक, शिवम आणि रिंकूने ज्या प्रकारे फलंदाजी केली मला वाटतं ते खूप कौतुकास्पद आहे.'
पाकिस्तान सोबतचा सामना जिंकल्यानंतर भारतानं सुपर ८ मधील आपलं स्थान पक्क केलं आहे. सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा हा भारताविरूद्ध फिरकीचं जाळं निर्माण करेल असं वाटलं होतं. मात्र भारतानं या फिरकीच्या माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतानं दाखवून दिलं की टी २० क्रिकेटमध्ये भारतीय संघाला एवढं का घाबरतात.
सामन्यानंतर सूर्या म्हणाला, 'ज्यावेळी आम्ही १७५ धावांचा आकडा गाठला त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही १५ ते २० धावा जास्त केल्या आहेत. जर आम्ही १५५ धावा केल्या असत्या सामना टाईट झाला असता. मात्र १७५ हा चांगला स्कोअर होता. हार्दिक पंड्याने नवीन चेंडूवर गोलंदाजी करत चांगली ग्रीप निर्माण केली. बुमराहनं जे तो करतो ते या सामन्यात देखील उत्तम प्रकारे केलं. त्यानं त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हणतात हे दाखवून दिलं.
सूर्याने, वरूण, कुलदीप आणि अक्षरची देखील स्तुती केली. तो म्हणाला, 'वरूण, कुलदीप, अक्षर आणि तिलक यांनी देखील टिच्चून मारा केला. मला वाटतं की सर्वांना सामुहिक कामगिरी केली. भारताचा आता पुढचा सामना बुधवारी नेदरलँड्सविरूद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर आहे.