सूर्यकुमार यादव. Pudhari
स्पोर्ट्स

Suryakumar Yadav Interview :'हे असे कसे होऊ शकते?': T-20 विश्वचषक जिंकूनही संघातून वगळल्याबाबत सूर्यकुमारने प्रथमच सोडले मौन

आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने श्रेयस अय्यरची केली होती नवा कर्णधार म्हणून निवड

पुढारी वृत्तसेवा

Suryakumar Yadav T20 World Cup snub : भारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अखेर या वर्षीच्या सुरुवातीला विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच राष्ट्रीय संघातून वगळल्याबद्दल मौन सोडले आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सूर्यकुमार यादवला डावलून आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून निवड केली होती. सूर्यकुमारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांतील त्याचा फलंदाजीचा फॉर्म होता, या कालावधीत त्‍याला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला.

सूर्यकुमार T-20 मधील यशस्‍वी कर्णधार

२०२५ मध्ये सूर्यकुमारला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मात्र टी-२० विश्वचषकात वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध सामन्‍यात त्‍याची लक्षवेधी खेळी पाहायला मिळाली. तसेच कर्णधार म्हणून त्‍याची कामगिरी सरस होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही T-20 मालिका गमावली नाही आणि अखेरीस मायदेशात टी-२० विश्वचषकावरही मोहोर उमटवली.

तेव्हा मी फक्त हसलो...

संघातून वगळल्यानंतर सुरुवातीला आपली फारशी तिखट प्रतिक्रिया नव्हती, असे सूर्यकुमारने मान्य केले. भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "जेव्हा संघात माझे नाव नव्हते, तेव्हा मी फक्त हसलो. कारण जेव्हापासून मी संघासोबत क्रिकेट खेळत आहे, जेव्हा कधी माझ्यावर दडपण असते किंवा गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नसतात, तेव्हा मी नेहमी हसत राहतो. मी शांत राहतो. मला जेव्हा-जेव्हा चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे."

त्यांच्या विचारांचा आदर करणे महत्त्वाचे

" आता सध्या परिस्थिती आहे, याचा मी कधीच विचार केला नव्हता. २०२६ मध्ये आल्यानंतर मला वाटले होते की, मी आणखी दोन वर्षे या संघाला पुढे घेऊन जाईन. ऑलिम्पिक येईल. त्यानंतर आणखी एक टी-२० विश्वचषक आणि नवी आव्हाने असतील. पण त्याच वेळी, तुम्ही जे विचार करता आणि समोरची व्यक्ती जे विचार करते, या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यांच्या विचारांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. जत्यांना वाटले असेल की भविष्याच्या दृष्टीने हा योग्य निर्णय आहे, तर त्यांनी तो निर्णय घेतला. मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मला वाटले की तो त्यांचा निर्णय होता. भविष्यात जर हा संघ दुसऱ्या कोणाच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करू शकला, तर त्यात कोणतीही अडचण नाही," असेही सूर्यकुमारने स्‍पष्‍ट केले.

'निर्णय पचवणे कठीण गेले'

मात्र, आगरकर यांच्या निर्णयानंतर आपल्याला मानसिक संघर्ष करावा लागला, हे सूर्यकुमारने मान्य केले. कारण त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही मालिका गमावली नव्हती आणि भारताची टी-२० मधील कामगिरीही उत्कृष्ट होती."त्यांनी निवडलेला संघ मी पाहिला आहे. मी श्रेयससोबतही खूप क्रिकेट खेळलो आहे. मला माहीत आहे की तो एक चांगला खेळाडू, एक चांगला माणूस आणि एक चांगला कर्णधारही आहे. त्यामुळे त्याला कर्णधार का बनवले? असा प्रश्न माझ्या मनात नव्हता. पण होय, मी थोडा निराश नक्कीच होतो. कारण गेल्या दोन वर्षांत तुम्ही एकही मालिका गमावली नव्हती. तुम्ही विश्वचषक आणि आशिया चषक जिंकला आहे. मग तुम्हाला त्याच गोष्टी पुढे नेण्याची गरज असते. जेव्हा सर्व काही चांगले चालले आहे, तेव्हा बदलाचे कारण काय? हाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता. मी दीड महिना घरीच बसून होतो," असेही सूर्यकुमारने सांगितले.

मी विचार करत होतो, हे असे कसे होऊ शकते?

"मी विचार करत होतो, हे असे कसे होऊ शकते? हे कसे शक्य आहे? आपण नुकताच विश्वचषक जिंकला आहे. होय, आयपीएल (IPL) माझ्या अपेक्षेनुसार गेले नाही. आम्ही घरी बसून होतो. मित्र आले, कुटुंबीय आले. सगळे म्हणाले की ठीक आहे, हा आयुष्याचा एक भाग आहे. पण जेव्हा ते घराबाहेर जातात, तेव्हा आपण घरात एकटेच उरतो," असे त्याने स्‍पष्‍ट केले.

निवड समितीने साधला होता संवाद

निवड समितीने संघ जाहीर होण्याच्या तीन दिवस आधी त्याच्याशी संपर्क साधला होता आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचे नाव संघात नसेल हे त्याला कळवले होते. "संघ जाहीर होण्यापूर्वी २-३ दिवस आधी त्यांनी मला फोन केला होता. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण यात माझी चूक नाही. जो कोणी निर्णय घेतो, त्याने संघाच्या भल्यासाठीच विचार केला असेल. तुम्ही निर्णय घेतलात, मला सांगितलंत. काहीच अडचण नाही," असे सूर्यकुमार म्हणाला. "मी तयार आहे. तुम्ही मला कधीही बोलावू शकता. मी कधीही क्रिकेट खेळायला तयार आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की योग्य वेळ आली आहे, तेव्हा मी पुन्हा खेळेन," असेही त्याने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT