Shubman Gill Return to Team India's T20 squad may Lead After World Cup
सिडनी : आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातून शुभमन गिलला वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला असला तरी, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने एका मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. विश्वचषक संपल्यानंतर शुभमन गिल केवळ संघात पुनरागमनच करणार नाही, तर भारतीय टी-२० संघाचे नेतृत्वही त्याच्याकडे सोपवले जाऊ शकते, असा खळबळजनक दावा क्लार्कने केला आहे.
२०१५ चा विश्वचषक विजेता कर्णधार मायकल क्लार्कच्या मते, बीसीसीआयने गिलला वगळण्याचा निर्णय केवळ आगामी विश्वचषकातील तातडीची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे. इंग्लंडच्या यशस्वी कसोटी दौऱ्यानंतर गिलच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. गेल्या १५ आंतरराष्ट्रीय टी-२० डावांत त्याला केवळ २९१ धावा करता आल्या. ‘‘अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने केवळ विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. भारताकडे सलामीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूला वगळणे तर्कसंगत ठरते,’’ असे क्लार्कने नमूद केले.
‘Beyond23 क्रिकेट पॉडकास्ट’मध्ये बोलताना क्लार्क म्हणाला, ‘‘शुभमन गिल सध्या त्याच्या सर्वोत्तम लयीत नाही आणि हीच मुख्य अडचण ठरली. विश्वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असावा. मात्र, यामुळे भविष्यातील चित्र बदलत नाही. विश्वचषक संपल्यानंतर तो केवळ संघात परतणार नाही, तर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते, हे पाहून आश्चर्य वाटायला नको.’’
क्लार्कच्या मते, तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असावा, या धोरणाकडे बीसीसीआयचा कल आहे. सध्या सूर्यकुमार यादवलाही फॉर्मसाठी संघर्ष करावा लागत असल्याने, विश्वचषकानंतर गिलकडे टी-२० चे कर्णधारपद सोपवणे हे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील आराखड्यासाठी योग्य ठरेल.
‘‘शुभमन गिल हा एक विलक्षण खेळाडू आहे. सध्या तो त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकत नसला तरी, त्याच्या क्षमतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. सध्या भारतीय संघ पूर्णपणे विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे, परंतु भविष्यात गिल पुन्हा एकदा केंद्रस्थानी असेल,’’ असा विश्वास क्लार्कने व्यक्त केला.