

T20 World Cup controversy PCB vs ICC over Bangladesh team matches
दुबई : आगामी टी-२० विश्वचषकाबाबत क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने भारतात प्रवासाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ढवळाढवळ करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला एक ईमेल पाठवला आहे. ज्यात पाकने बांगला देशच्या भूमिकेचे समर्थन केले असून बांगला देशचे गट फेरीतील सामने पाकिस्तानात आयोजित करण्याचा प्रस्ताव मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वाखालील बोर्डाने दिला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीने आयसीसीला कळवले आहे की, बांगला देशने उपस्थित केलेली चिंता न्याय्य असून त्यांच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी मान्य केली जावी. या स्पर्धेचे सह-यजमानपद श्रीलंकेकडे असल्याने तिथे सामने हलवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, स्पर्धेला तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरलेला असल्याने वेळापत्रकात बदल करण्यास आयसीसी अनुत्सुक असल्याचे समजते. अशा परिस्थितीत, पाकिस्तानने बांगला देशचे तिन्ही गट फेरीतील सामने आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘जर बांगला देशचे सामने श्रीलंकेत हलवताना काही तांत्रिक अडचणी येत असतील, तर पाकिस्तान हे सर्व सामने खेळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बांगलादेश सरकारने राजनैतिक आणि क्रिकेटशी संबंधित मुद्द्यांवर पाकिस्तानकडे पाठिंबा मागितला होता. या चिंतेचे निराकरण न झाल्यास पाकिस्तान स्वतःच्या सहभागाबाबत पुनर्विचार करू शकतो, असेही संकेत मिळाले आहेत; मात्र पीसीबीने अद्याप अधिकृतपणे यावर भाष्य केलेले नाही. दरम्यान, भारत आणि आयसीसी दरम्यान २०२७ पर्यंत ठरलेल्या 'हायब्रिड मॉडेल'नुसार, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.
'कोलकाता नाईट रायडर्स'ने बीसीसीआयच्या निर्देशानंतर बांगला देशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त केल्यावर पडली. यानंतर बांगला देश सरकारने देशात आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातली. परिणामी, बांगला देश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्या संघाला विश्वचषकासाठी भारतात न पाठवण्याचा निर्णय आयसीसीला कळवला. गेल्या तीन आठवड्यांत ढाका येथे झालेल्या बैठकीसह चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही.
अंतिम निर्णयाकडे लक्ष बांगला देशने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बुधवारी बोर्डाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या वादाचा स्पर्धेवर काय परिणाम होतो, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.