RCB vs GT Rain Rule Explained: IPL 2026 मध्ये आज (मंगळवार, 26 मे) धर्मशालामध्ये पहिला क्वालिफायर सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या या हायव्होल्टेज सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचणार आहे, तर पराभूत संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळेल.
मात्र, सामन्यापूर्वीच एक महत्त्वाचा IPL नियम चर्चेत आला आहे. या नियमानुसार RCB ला सामना न खेळताही थेट फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो, तर गुजरात टायटन्सला मोठा फटका बसू शकतो.
IPL च्या नियमांनुसार क्वालिफायर-1 हा गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये खेळला जातो. यंदा RCB पहिल्या, तर गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर राहिली आहे.
जर पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि निकाल लागू शकला नाही, तर गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला पुढच्या फेरीत स्थान दिले जाते. यामुळे RCB ला थेट फायनलचे तिकीट मिळेल, तर गुजरातला मोठा धक्का बसू शकतो.
महत्त्वाची बाब म्हणजे IPL प्लेऑफमधील सामन्यांसाठी, फायनल वगळता, रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही. म्हणजेच क्वालिफायर-1, एलिमिनेटर किंवा क्वालिफायर-2 सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जाणार नाही. प्लेऑफ सामन्यांसाठी अतिरिक्त 120 मिनिटांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. लीग स्टेजमध्ये हा अतिरिक्त वेळ फक्त 60 मिनिटांचा होता.
धर्मशालामधील हवामानावर सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. जर पावसाचा व्यत्यय आला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर गुजरात टायटन्सला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. कारण नियमांनुसार RCB गुणतालिकेत अव्वल असल्याने तिला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल. आता सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.