mumbai indians vs delhi capitals
नवी दिल्ली : समीर रिझवीच्या सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२६ मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने १६३ धावांचे लक्ष्य ११ चेंडू राखून पूर्ण केले.
दिल्ली कॅपिटल्सने समीर रिझवीचे शानदार अर्धशतक आणि पाथुम निसंकाच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सनी पराभव केला. १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने दमदार खेळ दाखवला. रिझवीने ९० धावांची तुफानी खेळी केली, तर निसंकाने ४४ धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, कठीण खेळपट्टीवर मुंबईचा संघ ६ बाद १६२ धावाच करू शकला. मुंबईकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५१ धावा केल्या. मुंबईचा दोन सामन्यांतील हा पहिला पराभव आहे, तर दिल्लीने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात केएल राहुल (१) बाद झाला. पुढच्याच षटकात नितीश राणा (०) चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला, त्यामुळे दिल्लीची अवस्था २ बाद ७ अशी झाली होती. मात्र, निसंका आणि रिझवी यांनी डाव सावरला. दोघांनी वेगाने ६७ धावांची भागीदारी करून सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला. निसंका ३० चेंडूत ४४ धावा करून मिचेल सँटनरचा बळी ठरला.
रिझवीने सलग दुसऱ्या सामन्यात आपली चमक दाखवली. त्याने अवघ्या ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतरही त्याने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. रिझवीने ५१ चेंडूत ७ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. शतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात १७ व्या षटकात कॉर्बिन बॉशच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने रायन रिकल्टन (९) आणि तिलक वर्मा (०) यांना एकाच षटकात गमावले. मुकेश कुमारने या दोघांनाही तंबूत धाडले. अशा स्थितीत रोहित शर्माने सूर्यासोबत मिळून डाव सावरला. दोघांमध्ये ५३ धावांची भागीदारी झाली. रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण अक्षर पटेलने त्याला नितीश राणाच्या हाती झेलबाद करत त्याची खेळी संपवली.
शेरफेन रदरफोर्ड पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि केवळ ५ धावा करू शकला. सूर्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या, त्यानंतर लुंगी एन्गिडीने त्याला पायचीत (LBW) केले. शेवटच्या षटकांमध्ये नमन धीर (२८), मिचेल सँटनर (१८) आणि कॉर्बिन बॉश (११) यांनी महत्त्वाच्या धावा जोडल्या, ज्यामुळे मुंबईने १५० धावांचा टप्पा ओलांडला. दिल्लीकडून मुकेश कुमारने सर्वाधिक २ बळी घेतले, तर एन्गिडी, अक्षर, विप्रज निगम आणि नटराजन यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.