Mohammed Shami dropped
मुंबई : टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाबाहेरच राहणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी संघांची घोषणा केली, ज्यामध्ये ३५ वर्षीय शमीला पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे.
शमीने भारतासाठी आपला शेवटचा सामना मार्च २०२५ मध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळला होता. त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत शानदार पुनरागमन केले होते, तरीही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आले नाही.
सध्या शमी 'इंडियन प्रीमियर लीग २०२६' (IPL 2026) मध्ये खेळत आहे. त्याने १२ सामन्यांत ८.८१ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत १० बळी घेतले आहेत. मात्र, त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत किंवा विशेषतः आयपीएल २०२६ दरम्यान, त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून त्याहूनही अधिक राहिला आहे.
अफगाणिस्तान मालिकेसाठी शमीला डावलण्याबाबत विचारले असता, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले की, तो सध्या केवळ सर्वात लहान फॉरमॅटसाठीच (T20) तयार आहे. "आम्हाला सांगण्यात आले आहे की, सध्याच्या घडीला तो फक्त टी-२० क्रिकेटसाठी तयार आहे. त्यामुळे मोहम्मद शमीच्या नावावर (कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी) कोणतीही चर्चा झाली नाही," असे आगरकर म्हणाले.
शमीऐवजी जम्मू-काश्मीरचा उगवता वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू अकिब नबी याच्या नावाचा विचार करण्यात आला.
भारताने कसोटी संघासाठी नवीन उपकर्णधाराचीही घोषणा केली आहे. ऋषभ पंतच्या जागी आता केएल राहुलकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, पंत कसोटी संघात कायम आहे.अफगाणिस्तानविरुद्धचा हा सामना 'जागतिक कसोटी अजिंक्यपद' (WTC) स्पर्धेचा भाग नसला, तरी भारताची कसोटीतील घसरती कामगिरी—विशेषतः घरच्या मैदानावर—लक्षात घेता या एकमेव सामन्याला मोठे महत्त्व आहे.
एकेकाळी फिरकी गोलंदाजीचा उत्तम सामना करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेला भारतीय संघ, आता तशाच परिस्थितीत चाचपडताना दिसत आहे. नोव्हेंबर 2025मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत प्रकर्षाने समोर आली होती. त्यामुळे फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा मार्ग भारतीय संघाला शोधावाच लागेल. चेतेश्वर पुजारा संघातून बाहेर पडल्यापासून भारताला तिसऱ्या क्रमांकासाठी (Number 3) अद्याप एकही स्थिर फलंदाज मिळालेला नाही. भारतीय फलंदाजीच्या फळीतील ही आणखी एक चिंतेची बाब बनली आहे.