IND vs WI live : बुमराहनंतर पंड्याचा विंडिजला दे धक्का! धोकादायक रदरफर्डला केले बाद

T20 World Cup 2026 Super 8 : अभिषेक शर्मा-संजू सॅमसन भारताचे सलामीवीर
IND vs WI live : बुमराहनंतर पंड्याचा विंडिजला  दे धक्का! धोकादायक रदरफर्डला केले बाद

रुदरफोर्ड स्वस्तात माघारी; वेस्ट इंडिजची पडझड सुरूच

वेस्ट इंडिजच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेरफेन रुदरफोर्डला हार्दिक पंड्याने बाद करून कॅरेबियन संघाला चौथा मोठा धक्का दिला आहे. हार्दिकच्या चतुराईपूर्ण गोलंदाजीसमोर रुदरफोर्डचा निभाव लागला नाही आणि वेस्ट इंडिजचा संघ आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

१४.१ व्या षटकांत हार्दिक पांड्याने खेळपट्टीचा वापर करत 'ऑफ-कटर' चेंडू टाकला, जो डाव्या हाताच्या रुदरफोर्डपासून दूर जात होता. रुदरफोर्डने त्यावर एक हलका 'डॅब' शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कड घेऊन थेट यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात विसावला.

यष्टीरक्षक सॅमसनने झेल घेताच जल्लोष सुरू केला. पंचांनी बोट वर करण्यापूर्वीच रुदरफोर्डने मैदान सोडले. बाद झाल्याच्या रागात त्याने हवेत बॅट फेकून आपला संताप व्यक्त केला. त्याने ९ चेंडूत एका षटकारासह केवळ १४ धावा केल्या. प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी पाठवलेला संदेश अमलात आणण्यात तो अपयशी ठरला. हार्दिक पंड्याच्या या विकेटमुळे भारतीय प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, वेस्ट इंडिजचे एकापाठोपाठ एक गडी बाद होत असल्याने भारतीय संघ सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवताना दिसत आहे.

बुमराहचा डबल धमाका

जसप्रीत बुमराहने आपल्या एकाच षटकात दोन मोठे बळी घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला खिंडार पाडले आहे. शिमरॉन हेटमायरला बाद केल्यानंतर, बुमराहने स्थिरावलेल्या रोस्टन चेसलाही माघारी धाडले. या विकेटमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने घेतलेल्या अवाक करणाऱ्या झेलाची मोठी भूमिका राहिली.

११.५ व्या षटकात बुमराहने एक अतिशय चतुर 'स्लोअर' चेंडू टाकला. रोस्टन चेस या चेंडूच्या वेगाचा अंदाज घेऊ शकला नाही आणि चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून हवेत उडाला.

सूर्याचा 'सुपरमॅन' अवतार : चेंडू हवेत असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने उजव्या बाजूला धावत जाऊन पूर्ण ताकदीनिशी हवेत उडी घेतली आणि जमिनीला समांतर झोकून देत एक 'स्टनिंग' कॅच पकडला. सूर्याच्या अचूक टायमिंगमुळे हा अशक्य वाटणारा झेल शक्य झाला.

चेसची खेळी : रोस्टन चेसने २५ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ४० धावांची आश्वासक खेळी केली. मात्र, बुमराह आणि सूर्याच्या जुगलबंदीने त्याला बाद करत भारताला सामन्यात वरचढ ठरवले आहे.

मैदानावर रोव्हमन पॉवेल आला असून, बुमराहच्या या स्पेलमुळे वेस्ट इंडिजचा संघ आता बॅकफूटवर गेला आहे.

बुमराहचा 'पॉवर' गेम! हेटमायरचा अडसर केला दूर

जगातील अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत धोकादायक फलंदाज शिमरॉन हेटमायरला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. हेटमायरने अवघ्या १२ चेंडूत २७ धावा कुटून भारतीय गोलंदाजांवर दबाव निर्माण केला होता, मात्र बुमराह समोर येताच त्याची खेळी संपुष्टात आली.

११.३ व्या षटकात बुमराहने टाकलेला 'शॉर्ट ऑफ लेन्थ' चेंडू हेटमायरने स्लॉग करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची आतील कडा घेऊन यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात विसावला. पंचांनी बाद दिल्यावर हेटमायरने 'डीआरएस' (DRS) घेतला, मात्र अल्ट्राएजमध्ये स्पष्टपणे संपर्क दिसल्याने त्याला माघारी फिरावे लागले. टी-२० क्रिकेटमध्ये बुमराहने हेटमायरवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. आकडेवारीनुसार, बुमराहने केवळ २३ चेंडूंमध्ये हेटमायरला आतापर्यंत ६ वेळा बाद केले आहे. बाद होण्यापूर्वी हेटमायरने २ षटकार आणि १ चौकार ठोकत आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, बुमराहने आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याला बाद करून भारताचे सामन्यात वर्चस्व निर्माण केले.

वेस्ट इंडिजचे दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यामुळे आता भारतीय गोलंदाज आणखी किती दबाव वाढवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरुण चक्रवर्तीचा 'मॅजिक स्पेल'

वेस्ट इंडिजची सलामीची जोडी फोडण्यात अखेर भारताला यश आले आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आपल्या पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपला बाद करून भारताला पहिले महत्त्वाचे यश मिळवून दिले.

८.५ व्या षटकांत वरुणने टाकलेला चेंडू खेळपट्टीवर पडून वेगाने आत आला. शाई होपने ऑफ-साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूचा वेग आणि कोनाचा अंदाज न आल्याने तो बॅटच्या खालून थेट मध्यम यष्टीवर जाऊन आदळला. शाई होपने ३३ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३२ धावा केल्या.

चक्रवर्ती फॉर्ममध्ये दिसत असून त्याने आपल्या पहिल्याच षटकात विकेट घेतल्याने भारतीय गोटात उत्साहाचे वातावरण आहे. पॉवरप्लेमध्ये झेल सुटल्यानंतर आलेली ही विकेट भारताचे सामन्यातील पुनरागमन मानले जात आहे.

आता मैदानावर शिमरॉन हेटमायर आला असून, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलची जोडी कॅरेबियन फलंदाजांवर किती दबाव निर्माण करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रोस्टन चेसला जीवदान

पाचव्या षटकादरम्यान भारताच्या हातून मोठी संधी निसटली. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर सलामीवीर रोस्टन चेसचा सोपा झेल अभिषेक शर्माने सोडल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.

४.५व्या षटकांत बुमराहने एक चतुर 'स्लोअर डिलिव्हरी' टाकली. त्यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेसच्या बॅटची वरची कडा लागली आणि चेंडू हवेत उंच उडाला. एक्स्ट्रा कव्हरला उभा असलेला अभिषेक शर्मा चेंडूच्या दिशेने धावला. चेंडू पूर्णपणे त्याच्या आवाक्यात होता आणि दोन्ही हात चेंडूवर लागले असतानाही त्याच्या हातातून तो निसटला. हा अगदी सोपा झेल सुटल्याने भारतीय डगआउटमध्ये असलेल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. शांत स्वभावाच्या बुमराहने फारशी प्रतिक्रिया दिली नाही, मात्र या जीवदानामुळे रोस्टन चेसला एक मोठे आयुष्य मिळाले आहे.

वेस्ट इंडिजच्या बिनबाद धावसंख्येत ही मोठी चूक भारताला महागात पडणार की गोलंदाज ही चूक सुधारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पॉवरप्ले संपला: वेस्ट इंडिजची बिनबाद ४५ धावांपर्यंत मजल

पॉवरप्लेची ६ षटके संपली असून वेस्ट इंडिजने बिनबाद ४५ धावा करून आपली स्थिती मजबूत केली आहे. अक्षर पटेलच्या सहाव्या षटकात कॅरेबियन फलंदाजांनी १० धावा वसूल करत धावगती वाढवली.

षटकाचा थरार : अक्षर पटेलने टाकलेल्या सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाई होपने 'फुल टॉस'चा फायदा घेत कव्हर्समधून शानदार चौकार ठोकला. त्यानंतर रोस्टन चेसनेही अप्रतिम 'स्वीप' शॉट खेळत चेंडू सीमापार धाडला.

ड्रिंक्स ब्रेक आणि रणनीती : पहिल्या सहा षटकांनंतर 'ड्रिंक्स ब्रेक' घेण्यात आला. वेस्ट इंडिजसाठी ही सुरुवात समाधानकारक असली तरी, भारताने दिलेली जीवदाने (सुटलेला झेल) त्यांना महागात पडू शकतात. ब्रेक दरम्यान भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मैदानात आले असून त्यांनी खेळाडूंशी चर्चा करून नवीन रणनीती आखली आहे.

मैदानाची स्थिती : मैदानावर दव पडण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून मैदानाचे कर्मचारी दोरी फिरवून ग्राऊंड सुके ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पॉवरप्लेमध्ये यश न मिळाल्याने आता मधल्या षटकांत फिरकीपटू भारताला पहिले यश मिळवून देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

तिसऱ्या षटकात वेस्ट इंडिजचा पलटवार

सामन्याच्या तिसऱ्या षटकात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सलामीवीर रोस्टन चेसने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला लक्ष्य करत दोन सलग चौकार ठोकले आणि संघाची धावसंख्या २३ पर्यंत नेली.

रोस्टन चेसचा धमाका : २.५ व्या चेंडूवर चेसने अर्शदीपच्या 'फुलर लेंथ' चेंडूचा फायदा घेत समोरच्या दिशेला (लोफ्टेड ड्राईव्ह) एक टप्पा चौकार मारला. त्यानंतरच्या लगेचच्या चेंडूवर त्याने कव्हर ड्राईव्हच्या जोरावर पुन्हा चेंडू सीमापार धाडला.

धावबादची संधी हुकली : या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारताला मोठी संधी होती. वरुण चक्रवर्तीने चेंडू अडवून थ्रो केला, मात्र तो चुकीच्या बाजूला (गोलंदाजाच्या टोकाला) मारल्याने रोस्टन चेस थोडक्यात बचावला. शाई होप आणि चेस यांच्यातील ताळमेळ चुकल्याने चेस खेळपट्टीच्या मधोमध आला होता.

वेस्ट इंडिजने चेसला सलामीला पाठवून दिलेला 'सरप्राईज मूव्ह' सध्या यशस्वी होताना दिसत आहे. तो अँकरची भूमिका चोख बजावत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची सावध सुरुवात

सामन्याच्या पहिल्याच षटकात भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अत्यंत शिस्तबद्ध मारा करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जखडून ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतासाठी अर्शदीपने डावाची सुरुवात केली. त्याने आपल्या पहिल्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. त्याने आपल्या चेंडूंमध्ये 'इनस्विंग' आणि 'एक्स्ट्रा बाऊन्स'चा सुरेख वापर केला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होप आणि रोस्टन चेस मैदानात उतरले आहेत. शाई होपने ५ चेंडूंत २ धावा केल्या असून रोस्टन चेस १ धावेवर खेळत आहे. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पहिल्या षटकात सावध पवित्रा घेतला असून अर्शदीपच्या स्विंगला सन्मान दिला आहे. आता दुसऱ्या टोकाकडून जसप्रीत बुमराह किंवा फिरकीपटू काय कमाल करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

वेस्ट इंडिजचा संघ : शाई होप (कर्णधार), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकील हुसेन, गुडाकेश मोटी, शमर जोसेफ

सामन्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये

भारतीय फळी : भारताने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली आहे, तर मधल्या फळीत इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांची स्फोटक जोडी आहे.

विंडीजची चाल : वेस्ट इंडिजने अनपेक्षितपणे रोस्टन चेसला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, जो भारतीय गोलंदाजांसाठी एक वेगळे आव्हान ठरू शकतो.

फिरकीचे जाळे : दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन दर्जेदार फिरकीपटू (भारत: अक्षर, वरुण | विंडीज: अकील, मोती) खेळवून खेळपट्टीचा फायदा घेण्याचे संकेत दिले आहेत.

टी-२० विश्वचषकातील सर्वात हाय-व्होल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना 'आरपार'चा असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारताची रणनीती: धावांचा पाठलाग करण्यावर भर

टॉस जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात सलामीला पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची जोडी दिसणार आहे. मधल्या फळीत इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांच्यावर मोठी धावसंख्या उभारण्याची किंवा पाठलाग करण्याची जबाबदारी असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्यासोबत वरुण चक्रवर्तीची फिरकी निर्णायक ठरू शकते.

वेस्ट इंडिजचा मास्टरस्ट्रोक: रोस्टन चेस सलामीला!

वेस्ट इंडिजने या सामन्यासाठी आपल्या संघात अनपेक्षित बदल केले आहेत. जखमी ब्रँडन किंगच्या जागी अष्टपैलू अकील होसेनला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, सर्वांना चकित करणारा निर्णय म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज रोस्टन चेस आज सलामीला फलंदाजीसाठी येणार आहे. वेस्ट इंडिजने एका जास्तीच्या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान देऊन पॉवरप्लेमध्ये भारताला रोखण्याची रणनीती आखली आहे.

"आम्हालाही प्रथम गोलंदाजीच करायची होती. सातत्यपूर्ण क्रिकेट खेळणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमचे अनेक खेळाडू आयपीएल खेळलेले असल्याने त्यांना परिस्थितीचा अंदाज आहे. हा 'करा किंवा मरा' असा सामना असून मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचेच आमचे स्वप्न असते."

— शाई होप, कर्णधार, वेस्ट इंडिज

टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी आज भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर यापेक्षा मोठा थरार असूच शकत नाही. समीकरण अगदी स्पष्ट आहे; जो जिंकेल तो संघ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडसोबत अंतिम चारमध्ये सामील होईल. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकदाच पराभवाची चव चाखली आहे आणि तीही 'सुपर ८' मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. या पराभवामुळेच आजच्या सामन्याला 'व्हर्च्युअल कॉर्टर फायनल'चे स्वरूप प्राप्त झाले आहे. आजच्या लढतीत 'नेट रन रेट'ची गणिते गौण ठरणार असून, निव्वळ विजयच दोन्ही संघांना पुढचा मार्ग मोकळा करून देणार आहे.

पावसाचे संकट टळले; मैदानावर धावांचा पाऊस पडणार?

सुरुवातीला या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा होती, ज्याचा फायदा वेस्ट इंडिजला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ताज्या हवामान अंदाजानुसार पावसाची शक्यता कमी असून, चाहत्यांना एका पूर्ण आणि चुरशीच्या सामन्याचा आनंद घेता येईल. घरच्या मैदानावर खेळण्याचा आणि प्रेक्षकांच्या उदंड पाठिंब्याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच मिळेल. परंतु, २०१६ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजने भारताला दिलेला धक्का विसरून चालणार नाही.

अभिषेक आणि संजूच्या आगमनाने भारताची फलंदाजी भक्कम

भारतीय संघ या निर्णायक सामन्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने सज्ज आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा फॉर्मात परतल्याने भारताची चिंता मिटली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने ठोकलेले झंझावाती अर्धशतक आणि पॉवरप्लेमधील त्याची आक्रमकता भारतासाठी जमेची बाजू ठरेल. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या पुनरागमनाने फलंदाजीची फळी अधिक मजबूत झाली आहे. त्याने आपल्या छोटेखानी पण स्फोटक खेळीतून मधल्या फळीसाठी भक्कम पाया रचून दिला आहे.

तिलक वर्माचे चोख प्रत्युत्तर

गेल्या काही सामन्यांतील स्ट्राईक रेटवरून टीका होत असलेल्या तिलक वर्माने आपल्या बॅटनेच उत्तर दिले आहे. त्याने अवघ्या १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा कुटल्या. हार्दिक पांड्यासोबत त्याने डावाच्या अखेरीस केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

कॅरेबियन संघाची रणनीती: संयम आणि नंतर प्रहार

वेस्ट इंडिजने या स्पर्धेत एक साचेबद्ध पण यशस्वी रणनीती अवलंबली आहे. पहिले १० षटके संयमाने खेळून हाताशी विकेट राखणे आणि शेवटच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे, हा त्यांचा आजवरचा फॉर्म्युला राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकमेव पराभव वगळता त्यांनी सलग ५ विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे.

अष्टपैलू रोमारियो शेफर्डचे आव्हान

वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची खोली अफाट आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८३ धावांत ७ गडी बाद झालेले असतानाही, नवव्या क्रमांकावर आलेल्या रोमारियो शेफर्डने जिगरबाज अर्धशतक झळकावून संघाला १७६ धावांपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना शेवटच्या चेंडूपर्यंत सावध राहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news