IPL 2026 Rajasthan Royals new captain announcement
जयपूर : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने आपल्या नव्या कर्णधाराच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या जागी आता युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना दिसेल. गेल्या हंगामात सॅमसनच्या अनुपस्थितीत परागने काही सामन्यांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळली होती.
२०२६ च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. प्रदीर्घ काळ संघाचे नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला 'ट्रेड विंडो'द्वारे चेन्नई सुपर किंग्सकडे (CSK) सोपवण्यात आले आहे. या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम कुरन राजस्थानच्या संघात सामील झाले आहेत. सॅमसन संघातून बाहेर पडल्यानंतर अनुभवी रवींद्र जडेजा किंवा फॉर्मात असलेला यशस्वी जैस्वाल यांच्याकडे कर्णधारपद जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, फ्रँचायझीने सर्व चर्चांना पूर्णविराम देत २४ वर्षीय रियान परागवर विश्वास दर्शवला आहे.
सॅमसनने तब्बल ११ मोसमांनंतर राजस्थान रॉयल्स सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या हंगामानंतर त्याने संघ बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्यामुळे आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा 'ट्रेड' यशस्वी झाला.
आयपीएल २०२५ चा हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी निराशाजनक राहिला होता. संजू सॅमसन दुखापतीमुळे ८ सामन्यांना मुकला होता, त्यावेळी परागने हंगामी कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला ८ पैकी केवळ २ सामन्यांत विजय मिळवता आला, तर ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, कर्णधार म्हणून परागच्या वैयक्तिक फलंदाजीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. त्याने त्या ८ सामन्यांत ३८.५७ च्या सरासरीने धावा केल्या, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या ९५ धावांच्या खेळीचा समावेश होता.
पदार्पण : २०१९ (तेव्हापासून राजस्थान रॉयल्सचा अविभाज्य भाग).
एकूण सामने : ८४
एकूण धावा : १५६६ (सरासरी २६.१)
सर्वोत्तम हंगाम : २०२४ (५७३ धावा, सरासरी ५२.०९).
अष्टपैलू योगदान : फलंदाजीसोबतच त्याने आतापर्यंत ७ बळीही टिपले आहेत.
राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी कर्णधार निवडीपूर्वी अनेक खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्यामध्ये परागची निवड अंतिम करण्यात आली. राजस्थानच्या कोचिंग सेटअपमध्येही मोठे बदल झाले आहेत; राहुल द्रविड यांनी २०२५ च्या हंगामानंतर संघाची साथ सोडली आहे. मागिल हंगामात हा आयपीएल संघ गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर फेकला गेला होता.