

कोलंबोतील महामुकाबल्याकरिता आशियाई गटातील पाच देशांच्या प्रमुखांना आमंत्रण
भारत, पाकिस्तान, बांगला, श्रीलंका, अफगाणचे प्रतिनिधी उपस्थित राहणार
नव्या कराराची तयारी
कोलंबो : आयसीसी टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटच्या मैदानात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. बांगला देश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमीनुल इस्लाम हे हा सामना पाहण्यासाठी कोलंबोमध्ये उपस्थित राहणार असून, यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) सुरू असलेला गेल्या काही आठवड्यांचा तणाव निवळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एका बांगला देशी वृत्तपत्राशी बोलताना इस्लाम यांनी सांगितले की, आयसीसीने आशियाई गटातील पाच महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांना या सामन्यासाठी आमंत्रित केले आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश आणि अफगाणिस्तान या देशांच्या प्रतिनिधींनी एकत्र बसून संवाद साधावा, अशी आयसीसीची इच्छा आहे. बीसीसीआयसोबतचे संबंध सुधारण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे इस्लाम यांनी मान्य केले.
बीसीसीआय आणि बीसीबी यांच्यातील संघर्षाची सुरुवात वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याच्या आयपीएल करारावरून झाली होती. कोलकाता नाईट रायडर्ससोबतचा त्याचा करार बीसीसीआयने अचानक रद्द केल्यामुळे तणाव वाढला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बांगला देशने भारतात खेळण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांची विश्वचषकातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी स्कॉटलंडला संधी देण्यात आली.
पाकिस्ताननेही सुरुवातीला बांगला देशला पाठिंबा देत भारतावरील बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. मात्र मध्यस्थीनंतर हा तिढा सुटला. आता आयसीसीने 2028-2031 च्या सायकलमध्ये बांगला देशला एका मोठ्या स्पर्धेचे यजमानपद देण्याचे आश्वासन दिले आहे. भविष्यात कोणतीही अनिश्चितता राहू नये म्हणून आम्ही आयसीसीसोबत एक लेखी सामंजस्य करार करणार आहोत. प्रत्येक ओळ स्पष्ट असेल, जेणेकरून कराराचे उल्लंघन होणार नाही, असे अमीनुल इस्लाम यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, कोलंबोतील ही भेट आशियाई क्रिकेटमधील कटुता संपवण्यासाठी निर्णायक ठरेल, अशी चिन्हे आहेत.