

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये रविवारी (१५ फेब्रुवारी) रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्यासाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. 'लिटिल मास्टर' सुनील गावस्कर यांच्या मते, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी 'चायनामन' फिरकीपटू कुलदीप यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले जाऊ शकते.
गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दिल्ली येथे नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ९३ धावांनी विजय मिळवला असला, तरी अर्शदीप सिंगची कामगिरी साधारण राहिली. अर्शदीपने आपल्या कोट्यातील चार षटकेही पूर्ण केली नाहीत, ही बाब निवडीच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते.
गावस्कर यांनी 'स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्ह'वर आपले मत मांडताना सांगितले की, ‘नामिबियाविरुद्ध आपल्या सर्वच गोलंदाजांनी बळी टिपले. मात्र, अर्शदीपने चार षटके पूर्ण केली नाहीत, तर दुसरीकडे शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांनी आपला कोटा पूर्ण केला. हे स्पष्ट संकेत आहेत की पाकिस्तानविरुद्ध अर्शदीपच्या जागी कुलदीप यादवचा समावेश होऊ शकतो. श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असून भारताने यापूर्वीही तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याचा प्रयोग केला आहे. त्यामुळे कोलंबोतील सामन्यात कुलदीप खेळण्याची दाट शक्यता आहे.’
गावस्कर यांच्या मते, कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची रणनीती लक्षात घेऊनच गोलंदाजीत बदल केले. हार्दिक पंड्याने पहिले षटक टाकणे हे अर्शदीप पुढील सामन्यात न खेळण्याचे लक्षण असू शकते. तसेच, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या प्रभावी गोलंदाजीचेही गावस्कर यांनी कौतुक केले. वरुणने केवळ दोन षटकांत आपली छाप पाडली, तर अक्षरने तीन षटकांत दोन बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
अभिषेक शर्माच्या जागी संधी मिळालेल्या संजू सॅमसनच्या फलंदाजीवरही गावस्कर यांनी प्रकाश टाकला. नामिबियाविरुद्ध सॅमसनने ८ चेंडूत २२ धावा (३ षटकार) केल्या, मात्र तो लवकर बाद झाला. गावस्कर म्हणाले की, ‘संजू सॅमसनच्या तंत्रात काही उणिवा आहेत. तो क्रीजमध्ये खूप आत जातो आणि फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. सलामीला फलंदाजी करताना त्याला आपल्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. नामिबियाने त्याच्यासाठी रचलेले क्षेत्ररक्षण लक्षणीय होते. पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाल्यास त्याला खेळपट्टीवर अधिक वेळ घालवावा लागेल.’