Ind vs Eng Test Series 2025 Tendulkar-Anderson Trophy
नवी दिल्ली : काही दिवसांवर आलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड ही कसोटी क्रिकेट मालिका क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी उत्सुकतेची ठरणार आहे. या सीरीजला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक नवे नाव दिले आहे. ही ट्रॉफी यापुढे तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी (Tendulkar-Anderson Trophy) म्हणून ओळखली जाणार आहे.
क्रिकेटमधील दोन महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले असले तरी त्यावरून आता नाराजी व्यक्त होत आहे. कारण या ट्रॉफीचे पूर्वीचे नाव पतौडी ट्रॉफी असे होते. आणि पतौडी ट्रॉफीचे नाव बदलल्यावरून काही ज्येष्ठ खेळाडुंनी नाराजी व्यक्त केली आहे.
20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणाऱ्या या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमुळे क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली आहे. या सीरीजच्या नाव बदलण्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी, क्रिकेटमधील ऐतिहासिक संदर्भ आणि क्रिकेट दिग्गजांची मते जाणून घेऊया.
भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी पतौडी ट्रॉफीचं नाव बदलून ‘तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी’ केल्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचा (ECB) हा निर्णय त्यांनी अयोग्य आणि ऐतिहासिक परंपरेला धक्का देणारा असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी लिहिले आहे की, ""ECB पतौडी ट्रॉफी निवृत्त करत आहे ही बातमी खूपच अस्वस्थ करणारी आहे. याआधी कधी ऐकलं नव्हतं की एखाद्या दिग्गजाच्या सन्मानार्थ दिली जाणारी ट्रॉफी निवृत्त केली गेली आहे. एखादी ट्रॉफी, जी एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबाच्या नावावर आहे, तिला निवृत्त करणे ही बाब चिंताजनक आहे."
गावसकरांच्या मते, पतौडी कुटुंबाने भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांसाठी मोठं योगदान दिलं आहे, आणि त्या ऐतिहासिक परंपरेचा अपमान झाला आहे.
ECB ला ट्रॉफीचं नाव बदलण्याचा अधिकार आहे, मात्र गावसकर यांनी आशा व्यक्त केली की, भविष्यात भारतीय खेळाडूंनी आपलं नाव अशा ट्रॉफीला देण्यास नकार द्यावा, जेणेकरून अशाच पद्धतीने तीही कधी निवृत्त केली जाणार नाही. क्रिकेटमधील परंपरा, वारसा आणि ऐतिहासिक सन्मान टिकवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
या दोन्ही खेळाडुंच्या क्रिकेटमधील योगदानाला अनुसरून हे नाव देण्यात आले आहे. जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा (15921 धावा) केल्या आहेत. त्याने 1989 ते 2013 या काळात 200 कसोटी सामने खेळले आहेत.
तर जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा जलदगती गोलंदाज (704 बळी) म्हणून नाव कमावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर इंग्लंडचा बॉलिंग कन्सल्टंट म्हणून तो कार्यरत आहे.
तेंडुलकर आणि अँडरसन हे एकमेकांविरोधात 14 कसोटी सामन्यात आमनेसामने आले होते. त्यात अँडरसनने तेंडुलकरला सर्वाधिक 9 वेळा आऊट केले आहे.
पतौडी ट्रॉफी 2007 पासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दिली जात होती. पतौडी घराण्यातील इफ्तिखार अली खान पतौडी हे इंग्लंड आणि भारत दोन्ही संघांसाठी क्रिकेट खेळले होते. त्यांच्या मुलाने – मन्सूर अली खान पतौडी यांनी 60 च्या दशकात भारताचे नेतृत्व केले होते.
ही नवीन ट्रॉफी Crowe-Thorpe Trophyच्या धर्तीवर आहे, जी न्यूझीलंडचे मार्टिन क्रो आणि इंग्लंडचे ग्रॅहम थॉर्प यांच्या नावाने ओळखली जाते.
भारतीय आणि इंग्लिश क्रिकेटमधील दोन दिग्गजांना सन्मान देण्याचा हा निर्णय असला, तरी पारंपरिक आणि ऐतिहासिक पतौडी ट्रॉफीला निरोप देणे काही चाहत्यांना खटकलेले आहे. दरम्यान, आता, सर्वांच्या नजरा तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या ऐतिहासिक सामन्याकडे लागल्या आहेत.