Suryakumar Yadav Abhishek Sharma Pudhari
स्पोर्ट्स

Suryakumar Yadav: ‘तू आठ वेळा शून्यावर बाद झालास तरी फायनल खेळशील’, सूर्याने असं कोणाला सांगितलं?

Suryakumar Yadav Abhishek Sharma: वर्ल्ड कपमध्ये खराब फॉर्म असूनही सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीवर विश्वास ठेवला. त्याने अभिषेकला सांगितले की, आठ वेळा शून्यावर बाद झाला तरीही फायनल खेळशील.

Rahul Shelke

Suryakumar Yadav Abhishek Sharma: T20 World Cup मध्ये भारताने विजेतेपद पटकावलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी शानदार विजय मिळवला. मात्र हा प्रवास भारतीय संघासाठी सोपा नव्हता. स्पर्धेदरम्यान काही प्रमुख खेळाडूंना फॉर्मशी झुंज द्यावी लागली, तरीही संघ व्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास ठेवला.

अभिषेक शर्मावर ठेवला विश्वास

या स्पर्धेत सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म सुरुवातीला खूपच खराब होता. त्याला सलग तीन वेळा शून्यावर बाद व्हावे लागले. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली. पण नंतर त्याने दोन अर्धशतके झळकावली, तरीही त्याच्या अपयशामुळे मानसिक दबाव वाढला होता.

मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. त्याने अभिषेकला स्पष्ट सांगितले की, “तू सलग आठ वेळा शून्यावर बाद झालास तरीही अंतिम सामन्यात तूच खेळशील.” या शब्दांनी अभिषेकचा आत्मविश्वास वाढला आणि संघातील वातावरण सकारात्मक राहिलं.

वरुण चक्रवर्तीला देखील साथ

स्पर्धेत स्पिन गोलंदाज वरुण चक्रवर्तीलाही संकटाचा सामना करावा लागला. सुपर ८ पासून विरोधी फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

तरीही सूर्यकुमार यादवने त्याला संघातून बाहेर काढण्याचा विचार केला नाही. तो म्हणाला की, “वरुणने प्रत्येक सामन्यात ७० धावा दिल्या असत्या तरी मी त्याला संघात ठेवले असते.” त्याच्या मते अभिषेक, वरुण आणि संजू सॅमसन हे संघासाठी सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत.

सूर्यकुमार यादवने सांगितले की, स्वतःलाही करिअरमध्ये कठीण काळाचा सामना करावा लागला होता. २०२५ मध्ये त्याला एकही अर्धशतक करता आले नव्हते. त्यामुळे खेळाडूंना मानसिक आधार देणे किती महत्त्वाचे असते हे त्याला चांगले ठाऊक होते. त्याच अनुभवाच्या आधारे त्याने सहकाऱ्यांना आत्मविश्वास दिला.

अंतिम सामन्याच्या आधीची घालमेल

सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्याच्या आदल्या रात्रीची आठवणही सांगितली. तो म्हणाला की, त्या रात्री तो खूप तणावात होता. २०२४ च्या विश्वचषकाच्या आधी रोहित शर्मा किती तणावात होता हे त्याने पाहिले होते आणि त्याच भावना स्वतःलाही जाणवत होत्या.

मात्र त्याने आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवला. त्याच्या पत्नीनेही त्याला मानसिकदृष्ट्या शांत राहण्यास मदत केली. सुरुवातीच्या काही सामन्यांत संघ अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नव्हता, पण योग्य वेळी कोणीतरी संघाला पुढे नेईल असा त्याला विश्वास होता. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने स्वतः पुढाकार घेतला आणि संघाला विजय मिळवून दिला.

संघाच्या एकतेचा विजय

स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाने रणनीतीत बदल केले आणि अधिक आक्रमक खेळ दाखवला. खेळाडूंमधील विश्वास, नेतृत्व आणि संघभावना यामुळे भारताला अखेर विजेतेपद मिळवता आले.

या संपूर्ण प्रवासात सूर्यकुमार यादवने आपल्या खेळाडूंना दिलेला पाठिंबा आणि आत्मविश्वास हा संघाच्या यशाचा मोठा आधार होता. त्यामुळेच भारतीय संघाने आव्हानात्मक परिस्थितीतही शानदार कामगिरी करत टी-२० विश्वचषक आपल्या नावावर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT