Abeer Gulal TV Show
मालिकेत शुभ्रा अगस्त्यच्या प्रेमात वेडी झाली आहे Instagram
मनोरंजन

Abeer Gulal | 'अबीर गुलाल' मालिका रोमांचक वळणावर! श्रीचा जीव जडलाय अगस्त्यवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मालिकेतील श्री, शुभ्रा आणि अगस्त्य यांचं त्रिकूट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. मालिकेत शुभ्रा अगस्त्यच्या प्रेमात वेडी झाली आहे. अगस्त्यचं मन जिंकण्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे श्रीला आता सर्वत्र अगस्त्यचा भास होत आहे. श्रीचं विश्व अगस्तच्या भोवताली फिरत असताना अगस्त्य मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.

अगस्त्य हा निंबाळकर घराण्याचा मुलगा असून सुलक्षणा निंबाळकरांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला आहे. शुभ्रा आपल्या घराची सून व्हावी अशी अगस्त्यच्या आईची इच्छा आहे. तर शुभ्राने एक पाऊल पुढे येत अगस्त्यला लग्नासाठी प्रपोज केलं आहे.पण अगस्त्यने मात्र शुभ्राच्या प्रपोजला रिजेक्ट केलेलं प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळालं आहे.

दुसरीकडे, श्रीच्या अगस्त्यबद्दलच्या मैत्रीचं रुपांतर आता प्रेमात होऊ लागलं आहे. श्रीला सर्वत्र अगस्त्यचा भास होऊ लागला आहे. एकंदरीतच तिचा जीव अगस्त्यमध्ये दडलेला आहे. याआधी अगस्त्य आणि श्रीमधले गोड क्षण प्रेक्षकांना मालिकेत आणि प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहेत. पण आता हे सत्यात उतरेल का? श्री अगस्त्यला आपल्या प्रेमाची कबुली देणार का? अगस्त्य श्रीला आपलं सत्य सांगणार का? एका रात्रीत श्रीचं आयुष्य बदलणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिकाच पाहावी लागेल.

'अबीर गुलाल' मालिकेबद्दल बोलताना श्री म्हणजेच पायला जाधव म्हणते, "मालिकेतील प्रत्येक सीन छान पद्धतीने लिहून आल्याने ते करायला मजा येते. अगस्त्यसारखा मित्र प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवाच असतो. निखळ मैत्री ते प्रेमात पडणं हा प्रवास खूप गंमतीदार होता. श्री आता अगस्त्यच्या पूर्णपणे प्रेमात आहे. अभिनेत्री म्हणून या मालिकेत मला खूप खेळायला मिळतं. रोज वेगवेगळे सीन करताना त्यातले चढ-उतार पाहून खूप शिकायलादेखील मिळतं".

SCROLL FOR NEXT