नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) च्या वतीने घेण्यात आलेल्या 'एनटीपीसी' परीक्षा निकालात ( RRB NTPC Result Violence ) घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी केला हाेता. हा निकाल रद्द करा अशी मागणी करत शेकडाे परीक्षार्थींनी बिहारमध्ये बक्सर, मुजफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये रेल रोको आंदोलन केले. पश्चिम गुमटीजवळ सासाराम-आरा पॅसेंजरला आग लावली. पोलिसांवर दगडफेकही केली. गेली दोन दिवस सुरु असलेल्या या आंदोलनामुळे बिहारमधील रेल्वे सेवा कोलमडली आहे.
'आरआरबी'च्या वतीने 'एटीपीसी सीबीटी' १ परीक्षा डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीमध्ये आयोजित केली हाेती. यासाठी १ कोटी ४० लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली हाेती. या परीक्षाचा निकाल १४-१५ जानेवारी २०२२ रोजी जाहीर झाला. या निकालात घोटाळा झाला आहे असा आरोप करत परीक्षार्थींकडून करण्यात आला. तसेच सोशल मीडियावरुनही निकालातील गोंधळावर परीक्षार्थींनी आपली मते व्यक्त केली. मंगळवारी रात्री बिहारमधील परीक्षार्थी रेल्वे मार्गांवर उतरले. अनेक ठिकाणी रेल रोको आंदोलन सुरु केले. पश्चिम गुमटीजवळ सासाराम-आरा पॅसेंजरला आग लावली. या पॅसेंजचे इंजिनच्या मागील बाजूस आग लागली. यावेळी मोटारमनने प्रसंगावधान राखत ही आग बुझवली. त्यामुळे आग पसरली नाही. मात्र इंजिनचा आतील भाग आगीत भस्मसात झाला.
दगडफेकेच्या घटनेत अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहे. नवादा रेल्वे स्टेशनवर मशीन आणि सीटला आग लावण्यात आली. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. पाटणामध्ये आक्रमक परीक्षार्थींना पांगविण्यसाठी पोलिसांना लाठीमार केला. त्यावेळी परीक्षार्थींनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
परीक्षार्थींनी केलेल्या हिंसाचाराची 'आरआरबी'ने गंभीर दखल घेतली आहे. रेल्वे मार्गावर आंदोलन करणारे आणि हिंसाचार करणार्या परीक्षार्थींवर आजीवन प्रतिबंध लावण्यात येईल, असा इशारा 'आरआरबी'ने दिला आहे. तसेच या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये परीक्षा पास आणि नापास परीक्षार्थींचा समावेश आहे. आरआरबीने सीबीटी २ परीक्षेला स्थगित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचलं का?