Shankarwadi Underpass Waterlogging Signboard Pudhari
पिंपरी चिंचवड

Shankarwadi Underpass Waterlogging: ‘पाणी साचल्यास संपर्क करा’ म्हणणारा फलकच अर्धवट; शंकरवाडी भुयारी मार्गावर संपर्क क्रमांक गायब!

पावसाळ्यात पाणी साचून धोका; सूचना फलकावर अधिकारी-पदांची नावे मात्र फोन नंबर नाहीत, नागरिकांचा संतप्त सवाल

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: औंध, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी येथून वल्लभनगर, पिंपरी, निगडीकडे जाण्यासाठी शंकरवाडी पुलाखालून जावे लागते. त्यामुळे या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना धोका निर्माण होतो. पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचल्यास नागरिकांनी तातडीने संपर्क साधावा यासाठी प्रशासनाने शंकरवाडी येथील भुयारी मार्गावर मोठा सूचना फलक लावला आहे.

मात्र या फलकावर पाणी भरल्यास खालील नंबरवर संपर्क करा, अशी ठळक सूचना देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात संपर्क करण्यासाठी एकही क्रमांक नमूद केलेला नाही. त्यामुळे प्रशासनाचा हा अजब कारभार समोर आला असून, हा सूचना फलक नक्की कोणासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भुयारी मार्गावर लावण्यात आलेल्या फलकावर पाणी साचल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याखाली ठेकेदार, एस.एस.ई./कार्य., ए.डी.ई.एन. आणि सेक्शन इंजिनिअर अशा संबंधित जबाबदार पदांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या पदांसमोर देण्यात येणारे भ्रमणध्वनी क्रमांकच गायब असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात भुयारी मार्गात अचानक पाणी साचल्यास वाहनचालक आणि नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अशा वेळी प्रशासनाला माहिती देणे, मार्ग बंद करण्याची सूचना देणे किंवा मदत मागवणे आवश्यक असते. मात्र, संपर्कासाठी क्रमांकच उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 'सावधान'चा इशारा देणाऱ्या फलकावरच मदतीचा मार्ग बंद असेल, तर तो फलक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी किती उपयोगाचा? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

'सावधान'तेचा इशारा; मग प्रशासनाशी संपर्क कसा?

याच सूचना फलकावर पाणी लाल रेषेपर्यंत पोहोचल्यास पुलाचा वापर करू नये, असा सुरक्षेचा महत्त्वपूर्ण इशाराही देण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढल्यास भुयारी मार्गाचा वापर टाळणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. मात्र, पाणी लाल रेषेपर्यंत पोहोचले किंवा त्यापूर्वीच भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर त्याची माहिती प्रशासनाला द्यायची कशी? फलकावर फोन करा असे सांगितले पण फोन करायचा कोणाला याचा पत्ताच नाही. त्यामुळे सुरक्षेच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या या फलकाचीच विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

प्रशासनाचा नियोजनशून्‍य कारभार

केवळ सूचना फलक लावून जबाबदारी झटकण्यापेक्षा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. फलकावरील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अद्ययावत आणि कार्यरत संपर्क क्रमांक तातडीने नमूद करावेत. तसेच पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचल्यास त्वरित पाहणी, वाहतूक नियंत्रण आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी शंकरवाडी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्‍या नियोजनशून्‍य कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली.

शंकरवाडी भुयारी मार्गावरील हा सूचना फलक रेल्वे प्रशासनाकडून लावण्यात आलेला आहे. हा फलक अनेक वर्षांपासून येथे आहे. त्यामुळे त्यावरील संपर्क क्रमांकाबाबतची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा फलक महापालिकेकडून लावण्यात आलेला नाही. येथील रस्‍त्‍यात काही अडथळा असेल तर तो दूर केला जाईल.
स्थापत्य विभाग, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT