PMRDA  Pudhari
पिंपरी चिंचवड

PMRDA River Improvement Project: इंद्रायणी-पवना नदी सुधार प्रकल्पासाठी लवकरच निविदा; 27 गावांसाठी ₹976 कोटींचा एसटीपी उपक्रम

पीएमआरडीएकडून ₹826 कोटींचा नदी सुधार प्रकल्प; सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमुळे नदी प्रदूषणावर आळा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांपैकी इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्प पीएमआरडीएने हाती घेतला असून, या प्रकल्पासाठीच्या निविदा पुढील आठवड्यात प्रसिद्ध करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास येत्या दोन महिन्यांत नदी सुधार प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी साधारण 826 कोटी रुपयांच्या निविदा असतील.

या प्रकल्पाबरोबरच पीएमआरडीएच्या हद्दीतील गावांसाठी मैला व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. खेड, मावळ, मुळशी, हवेली आणि शिरूर या पाच तालुक्यांतील एकूण 27 गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, सिव्हर नेटवर्क आणि संबंधित कामांसाठी तब्बल 976 कोटी 17 लाख 79 हजार 566 रुपयांच्या पाच स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील काही निविदा भरल्या असून, लवकरच त्यावर कार्यवाही होणार असल्याची माहिती पीएमआरडीएने दिली.

या प्रकल्पांतर्गत डिझाईन, पुरवठा, बांधकाम, उभारणी व कार्यान्वयन यासह पाच वर्षे संचालन व देखभाल (ओ अँड एम) तसेच पाच वर्षांचा डिफेक्ट लाएबिलिटी पिरियड (डीएलपी) कंत्राटदारावर राहणार आहे. दीड महिन्यांच्या निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदारांची नियुक्ती करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. खेड तालुक्यातील सात गावांसाठी तीन क्लस्टरमध्ये 135 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील दोन गावांसाठी 453 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुळशी तालुक्यातील सहा गावांसाठी 272 कोटी रुपयांचा तर हवेली तालुक्यातील आठ गावांसाठी पाच क्लस्टरमध्ये 320काटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. शिरूर तालुक्यातील चार गावांसाठी 244 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या सर्व निविदांची एकत्रित किंमत 976 कोटी 17 लाख 79 हजार 566 रुपये इतकी असून, ग्रामीण व उपनगरी भागातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यावरण संवर्धन, भूजल प्रदूषण रोखणे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.

नदी प्रदूषणाला बसणार आळा

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे मैला व सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जाणार नाही. गावांमधील सांडपाणी प्रक्रिया करूनच पुढे सोडण्यात येणार असल्याने पुणे महानगर हद्दीतील नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांमधील वाढते प्रदूषण लक्षात घेता हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत. पर्यावरण संरक्षणासोबतच नदीपात्र आणि भूजल गुणवत्ता सुधारण्यासही या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT