पिंपरी: शहरात सुरू असलेल्या गॅस तुटवड्याचा थेट परिणाम आता पर्यायी स्वयंपाक साधनांवर दिसू लागला आहे. कोळसा शेगडी आणि इंडक्शन स्टोव्ह यांची अचानक वाढलेली मागणी लक्षात घेता बाजारात त्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, दरांमध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने नागरिक पर्यायी साधनांकडे वळले आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय आणि भाड्याने राहणाक्षयया कुटुंबांनी कोळसा शेगडी आणि इंडक्शनचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे विक्रेत्यांनी दर वाढविल्याचे चित्र आहे.
सद्यस्थिती
कोळसा शेगडीचा दर 500 वरून 1000 ते 1500 पर्यंत पोहोचला.
कोळशाच्या दरातही जवळपास दुप्पट वाढ
इंडक्शन स्टोव्हची उपलब्धता कमी
पंधरा ते वीस दिवसांची वेटिंग
दरात लक्षणीय वाढ
ग्राहकांना आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. मागणी अचानक वाढल्यामुळे पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे जास्त दर मोजूनही वस्तू मिळत नाहीत.
प्रशासनाची भूमिका
प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. आवश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून दरवाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती नागरिकांसाठी दुहेरी आर्थिक ताण निर्माण करणारी ठरत आहे. पर्यायी साधनांची वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे बाजारातील अस्थिरता वाढत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आखाती युध्दामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता आद्यौगिक क्षेत्रावर दिसू लागला आहे. आद्यौगिक गॅसचा पुरवठा कमी झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील चाकण एमआयडीसीतील कामगाराचे चांगलेच हाल होत आहेत. गॅसचा पुरवठा कमी, चढते दर, हॉटेल, मेसच्या वाढत्या किंमती यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांनी आता आपल्या मूळगावाची वाट धरली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या घरात आहे. झपाट्याने विकास झालेल्या शहरात परराज्यातील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झालेले आहेत. आखातातील युध्दामुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईच्या परिणाम व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील कामगार वर्गावर सर्वांधिक परिणाम झाला आहे. शहरात सुमारे 1200 ते 1500 हॉटेल, खानावळी आहेत. मात्र, गॅसचा पुरवठा, वाढते दर, हॉटेल आणि मेसच्या वाढत्या किंमती त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे हाल होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमुळे परप्रांतीय आपल्या मूळगावी परतत आहेत.
शहरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेगडी घ्यावी लागली, पण तीही महाग मिळते. इंडक्शनसाठी पंधरा, सोळा दिवसांची वेटिंग आहे. विद्यार्थ्यांना आणि कामगार वर्गाला इंडक्शन हा सोयीस्कर पर्याय वाटत असला तरी दर परवडत नाहीत. तसेच, गृहिणींना तर काम लवकर आटोपत नाही. त्यामुळे शासनाने या वाढीव दराव नियंत्रण ठेवावे.विनोद हिरवे, काळेवाडी, नागरिक
हॉटेल बंद असल्यामुळे कामगारांना घरी पाठविण्याची वेळ हॉटेलचालकांवर आली आहे. हॉटेलमधील अनेक कामगार परप्रांतीय असल्यामुळे त्यांना गॅस, रॉकेल मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळगावची वाट धरली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्याशिवाय पुन्हा ते परतण्याची शक्यता कमी आहे.गोविंद पानसरे, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज पिंपरी चिंचवड