पिंपरी: शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा माग काढण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेला (एटीबी) यश आले आहे. मे २०२५ पासून राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत पोलिसांनी २९ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला असून, त्यातील २६ जणांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. उर्वरित तिघांच्या डिपोर्टेशनची प्रक्रिया सुरू आहे.
विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त धीरज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी 'एटीबी'कडून सातत्याने स्थानिक स्तरावर माहिती संकलित केली जात आहे. संशयितांच्या वास्तव्याची खातरजमा, कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशी करून त्यांची खरी ओळख निश्चित केली जात आहे. त्यासाठी संशयितांनी दिलेली वैयक्तिक माहिती, वास्तव्याचा तपशील आणि उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करण्यावर पोलिसांचा भर आहे.
बनावट कागदपत्रांचे पोलिसांसमोर आव्हान
बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांकडून वेगळी नावे सांगणे किंवा बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्यास त्यांची खरी ओळख निश्चित करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते. संबंधित व्यक्तीचे मूळ गाव, भारतात प्रवेश करण्याची वेळ, वास्तव्याचा कालावधी आणि इतर माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करावी लागते. त्यामुळे शहरातील लॉज, भाड्याच्या खोल्या आणि अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या संशयित परदेशी नागरिकांबाबत मिळणाऱ्या माहितीची 'एटीबी'कडून पडताळणी केली जात आहे. देहूरोडमधील कारवाईतही तरुणीने सुरुवातीला वेगळी ओळख सांगितली; मात्र कागदपत्रे आणि अन्य माहितीची पडताळणी केल्यानंतर तिची खरी ओळख उघड झाली.
गुन्ह्याऐवजी थेट डिपोर्टेशन
मे २०२५ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना थेट त्यांच्या देशात पाठविण्याचे धोरण जाहीर केले. अशा नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्यास न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असल्याने डिपोर्टेशनला विलंब होत होता. तसेच, काही बांगलादेशी नागरिक जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा बेपत्ता झाल्याचे प्रकारही यापूर्वी समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेणे, त्यांची ओळख निश्चित करणे आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मायदेशी पाठविण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही शहरातील अशा नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्रपणे माहिती संकलन आणि पडताळणी मोहीम सुरू ठेवली आहे.
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मोहीम
खोटी ओळख किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची खरी माहिती स्थानिक यंत्रणेकडे नसल्यास त्यांची ओळख आणि वास्तव्याची खातरजमा करणे कठीण ठरते. त्यामुळे अशा नागरिकांचा वेळेत शोध घेणे, त्यांची खरी ओळख निश्चित करणे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. 'एटीबी'कडून माहिती मिळाल्यानंतर केवळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता तिची मूळ ओळख, कागदपत्रे आणि वास्तव्याचा तपशील तपासला जात आहे.
खोटे नाव सांगितले; पोलिसांनी शोधली खरी ओळख
देहूरोड येथील एका लॉजमध्ये खोट्या नावाने वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय बांगलादेशी तरुणीची खरी ओळख 'एटीबी'ने गुरुवारी (दि. १७) उघड केली. देहूरोड परिसरातील स्वर्ग लॉजमध्ये एक बांगलादेशी तरुणी बेकायदा राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, 'एटीबी'च्या पथकाने लॉजमध्ये जाऊन तिची चौकशी केली. संबंधित तरुणीने सुरुवातीला आपले नाव 'तन्हा खातून' असल्याचे सांगितले. मात्र, तिच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिच्याकडील माहितीची सखोल पडताळणी करण्यात आली. चौकशीत तिचे खरे नाव फिहा मोहम्मद मुजिबूर रहमान (१९, मूळ रा. बोयरा, जमालपूर, मदारगंज, बांगलादेश) असल्याचे निष्पन्न झाले. फिहा ही सुमारे वर्षभरापूर्वी भारतात अनधिकृतपणे दाखल झाली होती. भारतात वास्तव्य करत असतानाही ती 'आयएमओ' आणि 'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून बांगलादेशातील आई-वडिलांच्या संपर्कात होती. तिची खरी ओळख निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी तिला बांगलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नागरिकांनी घर, खोली किंवा लॉज भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी करावी. संशयास्पदरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांबाबत माहिती मिळाल्यास स्वतः कोणतीही कारवाई न करता तत्काळ पोलिसांना कळवावे.धीरज पाटील, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा, पिंपरी-चिंचवड