Pimple Gurav Rajmata Jijau Garden Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Rajmata Jijau Garden: पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यानाची दुरवस्था; तुटलेल्या खेळण्यांमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कचरा, सुकलेली झाडे आणि देखभालीअभावी उद्यानाची अवस्था बिकट; अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: राजमाता जिजाऊ उद्यान हे परिसरातील बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांसाठी विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या उद्यानाची सध्याची अवस्था मात्र पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. उद्यानातील अनेक खेळणी तुटलेल्या व धोकादायक अवस्थेत असून, त्यांची दुरुस्ती करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

दररोज शेकडो बालचमू या उद्यानात खेळण्यासाठी येत असतात. मात्र, तुटलेल्या खेळण्यांमुळे बालगोपाळांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. बालकांच्या सुरक्षिततेसारख्या संवेदनशील विषयाकडे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे.

याशिवाय उद्यानातील स्वच्छतेचाही बोजवारा उडालेला दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कचरा साचलेला असून, कुंड्यांमधील झाडे पाण्याअभावी सुकलेली दिसत आहेत. हिरवळ जपण्याऐवजी उद्यानाची दुरवस्था वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उद्यान विभाग आणि क्रीडा विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव की प्रशासनाची उदासीनता, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहर सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र उभारण्यात आलेल्या सुविधांची वेळेवर देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने हा खर्च केवळ कागदोपत्री तसेच विकासापुरता मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे. जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या सुविधांची अशी दुर्दशा होत असताना संबंधित अधिकारी मात्र मौन बाळगून असल्याची टीका उद्यानप्रेमींकडून केली जात आहे.

संबंधित प्रशासनाने तातडीने तुटलेली खेळणी बदलून नवीन खेळणी बसवावीत. उद्यानाची नियमित स्वच्छता करावी तसेच सुकलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवावी. जेणेकरून एखादा निष्पाप बालचमू अपघाताचा बळी ठरू नये. प्रशासनाने वेळीच जागे होऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून याप्रसंगी व्यक्त होत आहे.

प्रशासन अपघाताची वाट पाहतंय का?

राजमाता जिजाऊ उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती तातडीने न झाल्यास भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडू शकते. नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा प्रशासनासाठी कागदी अहवाल महत्त्वाचे आहेत का ? बालचमूंच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या या निष्काळजीपणाची जबाबदारी नेमकी कोण घेणार ? हाच खरा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT