गणेश विनोदे
वडगाव मावळ: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून घडलेल्या मावळ गोळीबार प्रकरणाला आज १५ वर्षे पूर्ण झाली असली, तरी आजही मावळातील शेतकऱ्यांचा विरोध ठाम आहे; परंतु या प्रकल्पाचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे आज एकत्र झाले आहेत. शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घाट घालत असल्याचे दिसत आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून पवना धरणातून थेट बंद जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याच्या नव्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती; परंतु पवना धरणातून बंद पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यास मावळ तालुक्यातील भारतीय किसान संघाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यानंतर तालुक्यातील भाजप, शिवसेना या पक्षांनीही या विरोधी आंदोलनात सहभाग घेतला.
जलवाहिनीच्याविरोधात गहूंजे येथे केलेले पहिले आंदोलन पोलिस बळाच्या जोरावर हाणून पाडण्यात आले होते. त्यानंतर ९ ऑगस्ट २०११ रोजी मावळ बंद पुकारण्यात आला व त्याच दिवशी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बौर येथे रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनास हिंसक वळण लागले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व शामराव तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले. तर, अनेक जण जखमी झाले. या मावळ गोळीबार प्रकरणाचे पडसाद केंद्र व राज्य पातळीवर उमटले आणि राज्य शासनाने या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिली.
प्रकल्प रद्द होण्याऐवजी स्थगिती उठली
त्यानंतरच्या १४ वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी निघून गेले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप-शिवसेना युती, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती अशी तीन सरकारे सत्तेवर येऊन गेली. आताही महायुती सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे समर्थन करणारे, विरोध करणारे सगळेच सत्तेवर आले; परंतु हा प्रकल्प रद्द होऊ शकला नाही. याउलट वर्षांपूर्वी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी असे तीनही पक्ष सत्तेत आले आणि हा प्रकल्प रद्द होण्याऐवजी तब्बल १२ वर्षे असलेली स्थगिती उठविण्यात आली. शासनाने स्थगिती उठविण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठीही वडगाव मावळ येथे सर्वपक्षीय मोठे आंदोलन झाले; परंतु पुढे याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. याउलट प्रकल्प पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले.
आता या लढ्यात राजू शेट्टींची एन्ट्री
दरम्यान, पवना धरणग्रस्त संयुक्त समितीच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे पुनर्वसन व बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, या लढ्यामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची एन्ट्री झाली आहे. वडगाव मावळ येथे नुकतीच पत्रकार परिषद घेऊन शेट्टी यांनी २ ऑक्टोबरला या दोन्ही प्रश्नासाठी लॉंगमार्च काढून पवना धरणात जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
शेतकरी बैठकांमध्ये गुंग; प्रशासन प्रक्रियेत दंग
सद्यस्थितीत मावळातील शेतकऱ्यांचा आजही या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे, परंतु या प्रकल्पाला समर्थन करणारे आणि यापूर्वी तीव्र विरोध करणारे आज महायुती सरकारमध्ये एकत्र असून, सरकारनेच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा घाट घातला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठकही झाली असून, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एका बाजूला शेतकऱ्यांना बैठकांमध्ये गुंतवून दुसरीकडे प्रशासकीय प्रक्रिया मात्र पूर्ण केली जात आहे.