गिरीश जानवेकर
चऱ्होली: पुणे आळंदी (पालखी) मार्गावरील दिघीजवळील मॅगझीन चौकात सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहने एकमेकांच्या समोर येऊन ठाकल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले.
पालखी मार्गावर जे विविध चौक आहेत त्यापैकी मॅगझीन चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा चौक आहे. कारण पुण्याकडून आळंदीकडे येणारी वाहने पुण्याकडून भोसरीकडे येणारी वाहने, पुणे स्टेशन, विश्रांतवाडी तसेच पुण्याच्या विविध उपनगरांमधून पुणे नाशिक रोडला मिळणारी वाहने, चऱ्होली आळंदीतून पुणे आणि भोसरीकडे जाणारी सर्व वाहने याच मॅगझीन चौकात एकत्र येतात. त्यामुळे मॅगझीन चौकातील सिग्नल यंत्रणेच्या बिघाडामुळे या सर्व मार्गांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला.
चाकण औद्योगिक क्षेत्रातून येणारी वाहतूक व कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे फुलगाव, मरकळ, धानोरे या सर्व औद्योगिक क्षेत्रातून येणारा कर्मचारी वर्ग संध्याकाळच्या वेळेला पालखी मार्गानेच मार्गस्थ होतो. तसेच, पिंपरी चिंचवड, भोसरी या ठिकाणच्या मोठ्या औद्योगिक आस्थापनांमधून तयार होणाऱ्या वाहनांसाठी आळंदीच्या परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळे हातभार लागतो. कारण, याच परिसरातून मोठ्या कंपन्यांसाठी कच्चामाल तयार करून पाठवण्यात येतो. त्यामुळे मॅगझीन चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. पण अचानक झालेल्या या सिग्नल बंदमुळे औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. औद्योगिक क्षेत्रातील माल वाहून नेणारे कितीतरी कंटेनर या ठिकाणी अडकून पडले होते.
प्रदूषणाचा त्रास
मॅगझीन चौक हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची आणि माणसांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशातच या ठिकाणी सिग्नल बंद पडल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. वाहनचालक एकमेकांसमोर येऊन उभे ठाकल्यामुळे कोणालाच पुढे जाता येईना आणि त्यात भरीस भर म्हणजे मोठ्या प्रमाणावर सर्व बाजूंनी हॉर्नचा आवाज येत असल्यामुळे ध्वनी प्रदूषण होत होते. वाहनचालकांना निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. या सर्व गोंगाटामुळे वाहनचालकांमध्ये वाद विवाद होण्याचे प्रसंग उद्भवले.
सिग्नल यंत्रणेमध्ये अचानकपणे बिघाड झाल्यामुळे मॅगझीन चौकात वाहनचालकांमध्ये गोंधळ उडाला. वाहने एकमेकांसमोर येऊन उभी ठाकल्यामुळे कोणालाच पुढे जाता येईना. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा असा प्रसंग उद्भवणार नाही यासाठी काळजी घ्यावी.तेजस काळजे, नागरिक
पालखी मार्गावर यापूर्वी देखील असे प्रसंग उद्भवले आहेत. पोलिसांनी व प्रशासनाने अशावेळी लक्ष घालणे गरजेचे आहे. नागरिकांना त्रास होणार नाही या गोष्टीला प्राथमिकता देणे गरजेचे आहे.सचिन तापकीर, नगरसेवक, महापालिका
नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. सध्या ही यंत्रणा व्यवस्थित प्रतिसाद देत नसून, त्यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कमीत कमी कालावधीत आम्ही नागरिकांना चांगली सिग्नल यंत्रणा उपलब्ध करून देऊ.विश्वनाथ चव्हाण, पोलिस निरीक्षक, दिघी-आळंदी वाहतूक