लोणावळा: शहरातून लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या स्काय वॉकच्या रस्त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रायवूड ते ट्रायोज मॉलदरम्यान 22 झाडे पुनर्रोपण करण्याची व 19 झाडे तोडण्याची सूचना लोणावळा नगर परिषदेने प्रसिद्ध केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
या सूचनेवर अनेकांनी हरकत नोंदविल्या आहेत. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारा विकास मान्य नाही, असे त्यांनी या हरकतीमध्ये म्हटले आहे. लोणावळा नगर परिषदेने 1 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटिशीनुसार या मार्गावरील एकूण 41 झाडांपैकी 22 झाडांचे पुनर्रोपण तर, 19 झाडे तोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत. स्कायवॉक प्रकल्पाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात ही झाडे अडथळा ठरत असल्याचे कारण दिले आहे.
प्रकल्पामध्ये बदल करून जास्तीत जास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, या प्रकल्प पीएमआरडीएमार्फत प्रस्तावित असल्यास त्याचा मंजूर डीपीआर, रस्ता रुंदीकरणाचा नकाशा, रस्त्याची मार्किंग, आवश्यक रस्त्याची रुंदी आणि संबंधित तांत्रिक मंजुरी नगर परिषदेस सादर करण्यात आली आहे का, याची माहिती नागरिकांसमोर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित 41 झाडांपैकी प्रत्येक झाडाची प्रजाती, अंदाजे वय, खोडाचा घेर, सद्यस्थिती तसेच तोडणी किंवा पुनर्रोपणाचे कारण यांची स्वतंत्र माहिती असलेला वृक्ष सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी हरकतीमध्ये करण्यात आली आहे.
वृक्ष समिती यांचा अहवाल सार्वजनिक करा
19 झाडे तोडणे अपरिहार्य असल्याचे कोणत्या तांत्रिक अहवालाच्या आधारे निश्चित करण्यात आले, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित वृक्ष समिती यांचा पाहणी अहवाल आणि पीएमआरडीएचा तांत्रिक अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 22 झाडांच्या पुनर्रोपणाबाबतही पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगत, ही झाडे नेमकी कुठे पुनर्रोपित केली जाणार, जागा निश्चित आहे का, कोणत्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्रोपण होणार आणि पुनर्रोपित झाडांच्या जिवंत राहण्याची जबाबदारी कोणाची असेल, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी हरकतीद्वारे करण्यात आली आहे. पर्यायी तांत्रिक उपायांचा स्वतंत्र अभ्यास होईपर्यंत आणि संबंधित कागदपत्रे, मंजूर आराखडा व तांत्रिक अहवाल नागरिकांसमोर येईपर्यंत 19 झाडे तोडण्यास अंतिम परवानगी देऊ नये. तसेच, प्रत्यक्ष वृक्षतोडीची कार्यवाही करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील हिरवळ होणार नष्ट
एका बाजूला पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्रकल्पासाठी हिरवाई नष्ट करायची, हे दीर्घकालीन दृष्टीने योग्य नाही. विकास हवा, पण निसर्गाच्या किंमतीवर नाही. लोणावळ्याचा विकासही झाला पाहिजे आणि हिरवाईही टिकली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते ट्रायोज मॉल या मार्गावरील प्रस्तावित वृक्षतोडीचा निर्णय तात्पुरता स्थगित करावा. तसेच, पीएमआरडीएचा मंजूर आराखडा व तांत्रिक अहवाल तपासावा, झाडे वाचविण्यासाठी पर्यायी उपायांचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच कायद्यानुसार निर्णय घ्यावा.नासिर शेख, शहराध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष