वडगाव मावळ: स्थानिक प्रशासनाशी कोणताही समन्वय न साधता रेल्वे प्रशासन येथील केशवनगर रेल्वेगेट सलग तीन दिवस बंद ठेऊन रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम करत असल्याने रेल्वे फाटकाच्या पलीकडे असलेल्या केशवनगर परिसरातील तसेच सांगवी गावातील सुमारे ५ हजार नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी नोटीस देऊन सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे सलग तीन कामकाजाचे दिवस रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याचे घोषित केले. वास्तविक असा निर्णय घेण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने स्थानिक प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची संपर्क साधून निर्णय घेणे अपेक्षित आहे.
याशिवाय आधीचे दोन दिवस म्हणजे शनिवार व रविवार सुटीचे दिवस सोडून सोमवार, मंगळवार व बुधवार या कामाच्या दिवशी रेल्वे गेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रेल्वे फटका पलीकडे असलेल्या सुमारे पाच हजार लोकांच्या येण्या-जाण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.
विद्यार्थी, कामगारांचे हाल
केशवनगर भागामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यात असून, दररोज वडगाव, तळेगाव भागातील शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, तळेगाव एमआयडीसी उर्से, टाकवे एमआयडीसी भागात कामाला जाणारा कामगार वर्ग तसेच कामानिमित्त वडगाव शहरातील बाजारपेठेत जाण्या-येण्यासाठी हा एकमेव मार्ग असताना तोही सलग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय वडगाव लगत असणाऱ्या सांगवी ग्रामस्थांनाही तालुक्यात कुठेही जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे, त्यामुळे त्यांचीही मोठी अडचण झाली आहे.
दर सहा महिन्यांनी तोच खेळ अन् तोच तमाशा
दरम्यान, दर पाच ते सहा महिन्यांनी याठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम केले जाते. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने ते गरजेचेही आग; परंतु ते करण्यापूर्वी तीन तीन दिवस रेल्वे गेट बंद ठेवण्याचा इतका मोठा निर्णय घेताना रेल्वे प्रशासनाने स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधनेही गरजेचे आहे. परंतु तसे न होता थेट नोटीस लावून हा निर्णय तब्बल ५ हजार नागरिकांवर लादला जातो, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.