देहूरोड: मावळ तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, देहूरोड परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
भाजीपाल्याचे नुकसान
अवकाळी पावसामुळे देहूरोड व आसपासच्या गावांमधील अंदाजे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावरील गहू, ज्वारी, कांदा, विविध भाजीपाला तसेच फळपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषतः काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके जमिनीवर आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारपिटीमुळे पिकांची पाने गळून पडली असून, उभी पिकेही सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
या अवकाळी पावसामुळे शेतीत पाणी साचल्याने पिकांच्या मुळांनाही फटका बसला आहे. कांदा आणि भाजीपाल्यासारख्या नगदी पिकांचे सर्वांधिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला असला तरी नुकसानभरपाई मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे.
कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी
दरम्यान, या परिस्थितीची गंभीर दखल घेत महसूल व कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी बाधित भागांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला असून, प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानाची पाहणी केली आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर अहवाल सादर करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कर्जमाफी देण्याची शेतकऱ्यांची मागणी
शेतकरी वर्गाने शासनाकडे तातडीने आर्थिक मदत, पीकविम्याची त्वरित अंमलबजावणी आणि कर्जमाफीसह दिलासा देण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या या फटक्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे सावट आले असून, तातडीच्या मदतीशिवाय त्यांना सावरणे कठीण असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.