देहूगाव: महाराष्ट्र शासनाच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात देहूकरांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे देहू येथील जीर्ण झालेले घर तसेच जन्मस्थान मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी विशेष विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना पुणे जिल्ह्यासाठी विविध विकासकामांच्या घोषणा केल्या. त्यामध्ये श्रीक्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थान मंदिराच्या जीर्णोद्धार व विकास आराखड्याचा समावेश आहे. या निर्णयामुळे श्री संत तुकाराम महाराजांचे जीर्ण घर व जन्मस्थान संरक्षित आणि विकसित होणार असून, परिसराचे सुशोभीकरण, ऐतिहासिक वास्तूंचे जतन तसेच भाविक व पर्यटकांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे श्री संत तुकाराम महाराजांचा आध्यात्मिक वारसा जपला जाऊन देहू या पवित्र तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी आषाढी वारी 2025 दरम्यान देहूला भेट देऊन श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिरात दर्शन घेतले होते. त्या वेळी या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज व्यक्त करत विकास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आता अर्थसंकल्पात अधिकृत घोषणा करून त्यांनी वारकरी संप्रदायाची दीर्घकालीन मागणी पूर्ण केल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर देहू परिसरात आनंदाचे वातावरण आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाउले’ या वचनाची आठवण डॉ. विवेकानंद मोरे यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, स्थानिक ग््राामस्थ व वारकरी भाविकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिराचा विकास आराखडा तयार करण्याबाबत आर्किटेक्ट व तज्ज्ञांशी चर्चा सुरू असून, लवकरच सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जन्मस्थान मंदिरासह संत तुकाराम महाराजांचे आजोळ म्हणून ओळखला जाणारा इनामदार वाडा तसेच, संतांच्या वंशातील मूळ पुरुष विश्वंभर महाराजांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांचाही विकास अपेक्षित आहे.गणेशमहाराज मोरे, विश्वस्त, देहू देवस्थान संस्थान
श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, अशी लाखो वारकऱ्यांची दीर्घकाळापासून इच्छा होती. ती राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे.ज्योती पारडे, शिक्षिका, देहूगाव