देहूरोड: निगडी ते गहुंजे-साईनगर मार्गावर धावणारी पीएमपीएमएलची 364 क्रमांकाच्या बसमध्ये सातत्याने बिघाड होऊन बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन महिन्यांत या बसला तीन वेळा बिघाड झाल्याची नोंद असून, दोनदा बसला आग लागण्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने या मार्गावर चांगल्या बस पाठवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास देहूरोड उड्डाणपूल परिसरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धावत्या बसचा कॉम्प्रेसर निकामी झाल्याने बस जागेवरच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
मुंबई-पुणे महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी बस बंद पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या मार्गावरील पीएमपीएमएल बसबाबत तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून, प्रवाशांकडून या मार्गावर नवीन व विश्वासार्ह बस देण्याची मागणी होत आहे.
या मार्गावर बसचा सतत बिघाड होत असल्याने वेळेवर कामावर पोहोचणे कठीण झाले आहे. वारंवार बस बंद पडत असल्यामुळे आम्हाला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ज्यामुळे खर्चही वाढतो. प्रशासनाने लवकरात लवकर नवीन व सुरक्षित बस उपलब्ध करून द्यावीएम. डी. चौधरी, समाजिक कार्यकर्ता
मुंबई-पुणे महामार्गासारख्या वर्दळीच्या रस्त्यावर बस बंद पडणे खूप धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पीएमपीएमएलने या मार्गावर चालणाऱ्या बसची नियमित तपासणी करावी आणि विश्वासार्ह सेवा द्यावी.प्रल्हाद खरात, कामगार