पुणे, पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाच्या भोळेभाबडेपणाचा फायदा घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक पिढ्या उद्ध्वस्त केल्या आहेत,' अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पुण्यात केली. पुण्यातील विधान भवनासमोर यशवंत ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह पडळकर यांनी धरणे आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मौजे वाफगाव येथील महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेला ऐतिहासिक भुईकोट किल्ला राज्य सरकारने ताब्यात घेऊन संवर्धन व जतन करावा.
तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे या मागणीसाठी यशवंत ब्रिगेडकडून धरणे आंदोलन करण्यात आले. पडळकर म्हणाले, 'रयत शिक्षण संस्थेने वाफगावच्या किल्ल्याचा ताबा सोडावा, अन्यथा आम्ही तो किल्ला ताब्यात घेणार. पवार जेजुरीत काही संबंध नसताना पुतळ्याच्या उद्घाटनाला गेले. सांगलीत उद्घाटन केले, तसे या वाफगावच्या किल्ल्याबाबत का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आम्ही आता चर्चा करणार नाही.
वेळ आली तर किल्ल्याचे आम्ही संवर्धन करू. वाफगावचा किल्ला ही पुरातन वास्तू आहे. पुरातन वास्तूचे जतन, संवर्धन करणे राज्य सरकारची जबाबदारी असते. गेली अनेक वर्षे हा किल्ला रयत शिक्षण संस्थेकडे आहे. त्यावर एक रुपयाही खर्च केलेला नाही. आता या किल्ल्याची पडझड होत आहे. त्यामुळे तो ताब्यात घ्यावा, नाही तर आम्ही लोकवर्गणीतून किल्ल्याचा विकास करू, असा इशारा पडळकरांनी दिला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.