राज्यातल्या एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याने हे आंदोलन चिघळले आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेत तर राज्य सरकारने ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ केलं आहे. त्यात राज्य सरकार कर्मचाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितल्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. (Padalkar vs Anil Parab)
गोपीचंद पडळकर म्हणाले, या कृतीमधून ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. मराठी एस.टी कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नाही, हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झाले आहे.
एखादा व्यक्ती जेव्हा हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलतो त्यावेळी त्याची अवस्था बिकट असते. त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढायची गरज असते. पण या सरकारने कालपासून एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू केले आहेत असं पडळकर म्हणाले.
ते म्हणाले, राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल. जागोजागी व गावोगावी पोलिसबळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जात आहे. यावरून सिद्ध होते की, शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचाय.
पोलिसांच्या लाठ्या -काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील", असं पडळकर म्हणाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राला मी आवाहन करतो की तुमच्या सुखा-दु:खात साथ देणाऱ्या लालपरीचे कर्मचारी आज आत्महत्येच्या दारात आहेत. आज त्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असेही पडळकर म्हणाले.