Pahalgam attack Neha Singh Rathore
लखनौ: पहलगाम हल्ल्यानंतर देशात दशतवादविरोधी मोठी संतापाची लाट पसरली आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी दहशतवादावर जोरदार टीका केली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून विरोधक देखील सत्ताधारी भाजप सरकारच्या मागे ठामपणे उभारताना दिसत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेशातील एका लोकगायिकेने पहलगाम हल्ल्यावरून सत्ताधारी मोदी सरकारविरोधात टिप्पणी केली आहे. यावरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल उत्तर प्रदेशातील लोकगायिका नेहा सिंग-राठोड हिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. तिच्या विरोधात रविवारी (दि.२७) लखनौमधील हजरतंगत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या अनेक कलमांखाली तिच्यावर एफआयआर दाखल केली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरणमध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर प्रदेशमधील लोकगायिका नेहा सिंग राठोड हिने २३ एप्रिल रोजी सोशल मीडिया एक्सवरून एक पोस्ट केली होती. तिने या पोस्टमध्ये " मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार जात आणि धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. भाजप सरकारने पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली मते गोळा करण्याचा प्रयत्न केला. पहलगाम हल्ल्याच्या बाबतीतही अशीच पुनरावृत्ती होईल". असा गंभीर आरोप करत नेहा हिने सत्ताधारी मोदी सरकारविरोधात टिप्पणी केली होती.
उत्तर प्रदेशातील कवी अभय प्रताप सिंग, ज्याला अभय सिंग म्हणूनही ओळखले जाते, यांनी हजरतगंज पोलिस ठाण्यात लोकगायिका नेहा सिंग-राठोड हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी "नेहा सिंग राठोड यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जातीवर आधारित द्वेष आणि देशविरोधी भावना पसरू शकते. तिच्या पोस्ट्समुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच यापूर्वी देखील नेहा यांच्यावर वारंवार सांप्रदायिक शांतता बिघडवणे तसेच देशाविरुद्ध जनमतावर नकारात्मक परिणाम करणारी सामग्री पोस्ट केल्याचा आरोप देखील कवी अभय सिंग यांनी केला आहे.
नेहा सिंग राठोड हिच्याविरोधात रविवार २७ एप्रिल रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या विविध कलमांनुसार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९A अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांनुसार, जातीच्या आधारावर द्वेष पसरवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवणे यासारखे आरोप तिच्यावर आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.