Udhayanidhi Stalin Sanatana Statement
चेन्नई: 'सनातन धर्म संपवावाच लागेल' असे वादग्रस्त विधान करणारे डीएमके (द्रमुक) आमदार आणि तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री विजय यांच्या उपस्थितीत तामिळनाडू विधानसभेत "सनातन संपवावाच लागेल" असे विधान उदयनिधी यांनी केले होते, आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वीही उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत असेच वक्तव्य केले होते, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कडक शब्दांत फटकारले होते. मात्र, यंदा त्यांनी हे वक्तव्य तामिळनाडू विधानसभेच्या आत केले आहे.
'लाइव्ह लॉ'च्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली असून, त्यात उदयनिधी यांच्या सनातन धर्म संपवण्याच्या विधानाचा उल्लेख करण्यात आला आहे. ही याचिका एका अवमानना याचिकेच्या अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण 'शाहीन अब्दुल्ला विरुद्ध भारतीय संघराज्य' या खटल्यात दाखल असलेल्या रिट याचिकेशी जोडलेले आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर (FIR) नोंदवण्याचे आदेश दिले होते. अमिता सचदेवा नावाच्या महिला वकिलाने ही अवमानना याचिका दाखल केली आहे.
याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, द्वेषयुक्त भाषण प्रकरणांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, ही याचिका त्यांच्या जुन्या विधानावर २९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आली होती आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने ती सुनावणीसाठी स्वीकारलीही होती. मात्र, आता यामध्ये नवीन मुद्द्याची भर घालण्यात आली असून, तामिळनाडू विधानसभेच्या कामकाजादरम्यानही उदयनिधी यांनी सनातन धर्म संपवण्याबाबत वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी, सप्टेंबर २०२३ मध्ये एका कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी केली होती आणि तो नष्ट केला पाहिजे, असे म्हटले होते. तेव्हाही यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, आता विधानसभेतील विधानावर उदयनिधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "आम्ही कोणत्याही देवाच्या किंवा श्रद्धेच्या विरोधात नाही, तर जातीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाचा आम्ही विरोध करतो," असे उदयनिधी यांनी म्हटले आहे.
'एक्स'वर पोस्ट करत विरोधी पक्षनेते उदयनिधी यांनी म्हटले की, "जेव्हा मी तामिळनाडू विधानसभेत बोललो, तेव्हा मी म्हणालो होतो की लोकांना विभागणारी जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. काही लोक यावरून माझ्यावर टीका करत आहेत. पण मी घाबरणारा माणूस नाही. द्रविडी चळवळ ही संघर्षातूनच उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर मला एक छोटेसे स्पष्टीकरण द्यायचे आहे. जातीव्यवस्था संपवणे याचा अर्थ धर्म किंवा पूजेला विरोध करणे असा घेतला जाऊ नये. जेव्हा मी म्हणतो की जातीव्यवस्था संपली पाहिजे, तेव्हा त्याचा अर्थ कोणीही मंदिरात जाऊ नये असा होत नाही. प्रत्येकाला समान अधिकार केवळ मंदिरातच नाही, तर समाजातही मिळाले पाहिजेत , असेही त्यांनी म्हटलं आहे.