Tamil Nadu Congress MLA oath controversy
चेन्नई: तामिळनाडूमध्ये काँग्रेससाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. तब्बल ५९ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. १९६७ नंतर काँग्रेस पहिल्यांदाच तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात सामील झाली आहे. मात्र, हा ऐतिहासिक क्षण एका वादाशिवाय पूर्ण होऊ शकला नाही. काँग्रेस आमदार एस. राजेश कुमार मंत्रिपदाची शपथ घेत असताना, त्यांनी व्यासपीठावरून काँग्रेस नेत्यांचा जयघोष केल्याने नवा वाद निर्माण झाला. नवीन मंत्र्यांना शपथ देणारे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी यावर तात्काळ आक्षेप घेतला.
किलियूर (Killiyoor) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असणारे राजेश कुमार हे, 'विजय' यांच्या नेतृत्वाखालील 'टीव्हीके' (TVK) सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.
अधिकृत कागदपत्रावरून शपथेचा मजकूर वाचत असताना, शपथ पूर्ण होताच राजेश कुमार यांनी अचानक काँग्रेस नेते के. कामराज, राजीव गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस नेत्यांच्या या जयघोषावर राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला जागेवरच कडक शब्दांत आठवण करून दिली. राज्यपाल आर्लेकर यांनी हसतमुख चेहऱ्याने पण स्पष्ट शब्दांत सुनावले, "हा तुमच्या शपथेचा भाग नाही." या घोषणाबाजीवर राज्यपालांनी टोकल्यानंतर एस. राजेश कुमार यांनीही हसून दाद दिली आणि ते शपथेच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी पुढे गेले.
शपथविधी सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये एस. राजेश कुमार हे, "तामिळनाडूतील काँग्रेसचे दिवंगत दिग्गज नेते के. कामराज यांचे नाव अमर राहो", "भारतरत्न राजीव गांधी अमर राहो" आणि "लोकनेते राहुल गांधी अमर राहो", अशा घोषणा देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तामिळनाडू विधानसभेत ५ आमदार असलेली काँग्रेस 'टीव्हीके' सरकारमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणुकीत बहुमत न मिळाल्यामुळे काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला. काँग्रेसने आपली जुनी मैत्रीण असलेल्या 'डीएमके' (DMK) सोबतची युती तोडून सर्वात आधी 'टीव्हीके'ला पाठिंबा जाहीर केला होता.
काँग्रेस गेल्या २० वर्षांपासून डीएमकेची मित्रपक्ष राहिली असली, तरी राज्यातील डीएमकेच्या मंत्रिमंडळात ते कधीही सामील झाले नव्हते.अभिनेते आणि नेते जोसेफ विजय यांनी १० मे रोजी मुख्यमंत्री म्हणून इतर ९ मंत्र्यांसह शपथ घेतली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला, ज्यामध्ये 'टीव्हीके'च्या २१ आणि काँग्रेसच्या २ आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.