Sonam Raghuvanshi bail news: चर्चित हनीमून मर्डर केसमध्ये आता एक नवा ट्विस्ट निर्माण होत आहे. राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात तिची पत्नी सोनम रघुवंशीला जामीन मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा देखील जामीनावर बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. तो बाहेर येणार की नाही याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनम आणि राज यांच्या संबंधांमुळं राजा रघुवंशीचा खून झाला असा आरोप झाला होता.
इंदौरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीचे लग्न ११ मे २०२५ मध्ये सोनम सोबत झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी म्हणजे २० मे रोजी दोघेही हनीमूनसाठी मेघालयमध्ये गेले होते. २३ मे रोजी राजा अचानक गायब झाला. सुरूवातीला तो बेपत्ता झाल्याचं मानलं जात होतं. मात्र तपासावेळी २ जून रोजी त्याचा मृतदेह मिळाला. त्यावरून त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवली अन् हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर ८ जून रोजी सोनमने गाजीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. तपासात तिने पहिल्यांदा आम्हाला लुटल्याचा बनाव केला. मात्र नंतर खून झाल्याचं समोर आलं. तपासात पोलिसांनी सोनम आणि त्याचा कथित बॉयफ्रेंड राज कुशवाहा यांना अटक केली. या प्रकरणात एकूण ८ लोकांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
राज कुशवाहाच्या जामीन याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. राज कुशवाहाचे वकील पी. योबिन यांनी सांगितलं की न्यायालयासमोर आम्ही सर्व आवश्यक बाबी मांडल्या आहेत आता निर्णयाची प्रतिक्षा आहे. त्यांनी इतर आरोपींची जामीन याचिका देखील लवकरच दाखल करण्यात येईल असं सांगितलं.
सोनम रघुवंशीला जामीन देताना न्यायालयाने तपास प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. न्यायालयाने अटकेसंदर्भातील दस्तऐवजांमध्ये ज्या कलमांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यात त्रुटी असल्याचे सांगितलं. न्यायालयाने आरोपीला त्याला कोणत्या गुन्हाखाली आणि कोणत्या कलमांखाली अटक केली आहे हे स्पष्टपणे सांगणे गरजेचे असते. मात्र या प्रकरणात प्रक्रिया योग्यप्रकारे राबवण्यात आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांनी ही क्लेरिकल मिस्टेक असल्याचं सांगितलं मात्र न्यायालयाने ते मान्य केलं नाही. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ही चूक आरोपीच्या अधिकारांवर गदा आणू शकतात. न्यायालयाने अजून एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. आपल्या आदेशात न्यायालय म्हणते की सोनमला अटक केल्यानंतर वकिलाची सुविधा दिली गेली आहे असं कोणतंच रेकॉर्ड आढळून आलेलं नाहीये. ज्यावेळी तिला पहिल्यांदा गाजीपूर कोर्टात आणलं गेलं त्यावेळी देखील तिला कायदेशीर सल्ला घेण्याची संधी मिळाली होती की नव्हती हे स्पष्ट झालेलं नाही.