High Court Husband Exchange Case: मध्य प्रदेश उच्च न्यायालयात आलेल्या एका अनोख्या प्रकरणाने न्यायालयासह सर्वसामान्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अपहरणाच्या आरोपातून सुरू झालेलं हे प्रकरण सुनावणीदरम्यान कौटुंबिक वादात बदललं आणि दोन सख्ख्या बहिणींनी एकमेकींच्या पतींसोबत राहण्याची इच्छा न्यायालयासमोर व्यक्त केली.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील दतिया येथील रहिवासी गिरिजा शंकर यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे समोर आले. त्यांनी आरोप केला होता की मायाराम नावाच्या व्यक्तीने मेहुणीला आणि तिच्या मुलीला बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयच्या ग्वाल्हेर खंडपीठाने पोलिसांना संबंधित महिलेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.
मात्र सुनावणीदरम्यान महिलेनं न्यायालयात धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की तिचे अपहरण झालेले नाही, तर ती स्वतःच्या इच्छेने मायारामसोबत राहत आहे. तिने आपल्या पतीपासून विभक्त होण्यासाठी आधीच घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचे सांगितले.
या प्रकरणाला आणखी वेगळं वळण तेव्हा मिळालं, जेव्हा मायारामच्या पत्नीनेही याला विरोध केला नाही. उलट तिने न्यायालयात सांगितले की, तिच्या मोठ्या बहिणीला तिच्या पतीसोबत राहायचे असेल तर तिला त्याबाबत कोणतीही हरकत नाही. तसेच तिलाही बहिणीच्या पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले.
दोन्ही बहिणींनी न्यायालयात सांगितले की त्या आपल्या सध्याच्या वैवाहिक आयुष्यात समाधानी नाहीत आणि परस्पर संमतीने एकमेकींच्या पतींसोबत नवीन आयुष्य सुरू करू इच्छितात. विशेष म्हणजे दोघींनाही मुले आहेत.
संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की दोन्ही महिला सज्ञान आहेत आणि त्या स्वतःच्या इच्छेने निर्णय घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला अपहरणाचे स्वरूप देता येणार नाही. न्यायालयाने हे कौटुंबिक स्वरूपाचे प्रकरण असल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली.
सरकारी पक्षाच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले की संबंधित महिलेनं स्पष्टपणे कबूल केलं आहे की ती स्वेच्छेने बहिणीच्या पतीसोबत राहत असून भविष्यातही त्याच्यासोबत राहण्याची तिची इच्छा आहे.